ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १६ जून ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत ‘अतिसार थांबवा’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट ० ते ५ वयोगटातील बालकांमध्ये अतिसाराच्या प्रादुर्भावास प्रतिबंध घालणे आणि योग्य उपचार पोहोचवणे आहे. या मोहिमेअंतर्गत अतिसार बाधित बालकांना ओआरएसचे पाकीट आणि झिंकच्या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, आंगणवाडी केंद्रे आणि आरोग्य केंद्रांमध्ये ओआरएस घोळ तयार करण्याचे आणि स्वच्छतेसंबंधी हात धुण्याची प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत.

या मोहीमेच्या माध्यमातून संस्था स्तरांवर ओआरएस कॉर्नरची स्थापना करण्यासह जलशुष्कतेने बधित रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत. तसेच अतिसाराबाबत कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

वैयक्तिक आणि परिसरातील स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसार पसरविणा-या जंतूंचा प्रसार होऊन अतिसाराची लागण होते. उघड्यावर शौचास बसणे, उघडयावरील अन्न पदार्थ खाणे, दैनंदिन जीवनात अशुध्द पाण्याचा वापर करणे, जेवणाआधी आणि शौचानंतर स्वच्छ पाणी व साबणाने हात न धुणे अशा सवयी अतिसाराचा प्रादुर्भाव होण्याकरिता कारणीभुत आहेत.

अतिसाराच्या उपचाराकरीता ओआरएस चे घोळ तयार करुन बालकाला दिल्यास शरीरातील जलशुष्कतेचे प्रमाण कमी होते, तसेच क्षारांची कमतरताही भरुन निघते, झिंकची गोळी १५ दिवस दिल्यास जुलाबाची वारंवारता कमी होवून अतिसार लवकर बरा होतो, बाळाला अतिसार चालु असताना माता स्तनपान करीत असल्यास स्तनपान सुरु ठेवावे, बाळाला हलके अन्न दयावे, स्वच्छता राखावी, मुलांचे आणि स्वतःचे हात वारंवार साबणाने धुवावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिसार टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय

वैयक्तिक आणि परिसरातील स्वच्छता राखावी.
उघड्यावर शौचास जाणे टाळावे.
उघड्यावर विकले जाणारे अन्न खाणे टाळावे.
स्वच्छ आणि उकळून केलेले पाणीच वापरावे.
जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात धुवावेत.