Ganesh utsav 2025 : ठाणे : सहा फुटांपर्यंतच्या पीओपी गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम तलाव उभारले आहेत. असे असले तरी, गेल्या २० वर्षांपासून ठाणे महापालिका कृत्रिम तलावांची संकल्पना राबवित असून ठाणे महापालिका कृत्रिम तलाव उभारणी संकल्पनेची जनक आहे. परंतु एका प्रकल्पाकरिता निधी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एक अट घातली होती. त्याची पुर्तता करण्यासाठी पालिकेने ही संकल्पना राबविली आणि त्यास ठाणेकरांनी प्रतिसाद दिला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या पार्श्वभूमीवर पीओपी मूर्तीची खरेदी, विक्रीवरील बंदी न्यायालयाने उठवली होती. परंचु समुद्र आणि अन्य नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये पीओपी मूर्तीविसर्जनाला परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट करत धोरण आखण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते. यानंतर राज्य सरकारने न्यायालयात धोरण सादर केले होते. यानंतर सहा फुटांपर्यंतच्या पीओपी गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारले आहेत.
कृत्रिम तलावांची जनक
ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात ३७ हून अधिक तलाव आहेत. या तलावांचे प्रदुषण रोखण्यासाठी २००५ मध्ये तत्कालनी आयुक्त संजय सेठी यांनी कृत्रिम तलाव संकल्पना राबविण्यास सुरूवात केली. सुरूवातीला नागरिकांचा विरोध झाला. परंतु पालिकेने जनजागृती करत ही संकल्पना सुरूच ठेवली. त्यानंतर या संकल्पनेस नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे कृत्रिम तलाव निर्मितीची जनक ही ठाणे महापालिका असून ही संकल्पना आसपासच्या महापालिका गेल्या काही वर्षांपासून राबवित आहेत.
कृत्रिम तलाव कुठे ?
गणेश मुर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर, ऋतू पार्क, खिडकाळी तलाव, दातीवली तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं.१, रायलादेवी तलाव नं.२, उपवन येथे पालायदेवी मंदिर, आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वुडस् उपवन तलाव, बाळकुम रेवाळे आणि कावेसर(हिरानंदानी) या ठिकाणी कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. या कृत्रीम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कृत्रिम तलाव संकल्पने मागचे कारण काय ?
राज्य सरोवर संवर्धन योजना २००५ मध्ये राबविण्यात आली होती. या योजनेअंतर्गत ठाणे शहरातील नऊ तलावांच्या संवर्धनासाठी पालिकेला निधी उपलब्ध होणार होता. परंतु या निधीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या काही अटी होत्या. त्यात प्रामुख्याने तलावांचे प्रदुषण रोखण्याची अट होती. तसेच याच काळात तलावात प्रदुषण कशामुळे होते, याचा काही सामाजिक संस्थांनी अभ्यास केला होता. त्यात पीओपी मुर्तीमुळे प्रदुषण होत असल्याचे अहवालात म्हटले होते. त्यामुळे तलावा संवर्धनासाठी निधी मिळविण्याकरीता तत्कालीन आयुक्त संजय सेठी यांनी कृत्रिम तलावांची संकल्पना पुढे आणली. सुरुवातीला विरोध झाला पण, नंतर नागरिकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला, अशी माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.