ठाणे : ठाणे आणि मुंबई अहमदबाद मार्गांना जोडणाऱ्या घोडबंदर मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या मार्गावर जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असली तरीही सर्रास जड- अवजड वाहनांची वाहतूक होऊ लागली आहे. त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर झाला असून अवघ्या एक किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी वाहन चालकांना दोन किंवा त्याहून अधिक तास लागत आहेत. त्यामुळे चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अवजड वाहनांना बंदी असतानाही प्रवेश कसा दिला जातो असा प्रश्न वाहन चालक विचारत आहेत.

घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडत असतात. त्यामुळे येथील घाट रस्त्याच्या तात्पुरत्या स्वरुपात डागडुजीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात आहे. घोडबंदर मार्ग हा ठाणे तसेच मुंबई अहमदाबाद मार्गाला जोडतो. उरण येथील जेएनपीटी येथून जाणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे वसई किंवा गुजरातच्या दिशेने ये-जा करत असतात. राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या (एसटी), महापालिका परिवहन विभागाच्या बसगाड्यांसह हलक्या वाहनांची वाहतूक येथून मोठ्याप्रमाणात होत असते. येथील दुरुस्ती कामामुळे वाहन चालकांना दररोज कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागतो.

हेही वाचा – ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील पहिली चाचणी यशस्वी

हेही वाचा – ठाण्याच्या काही भागात पाणीटंचाईचे संकट, मुंबई महापालिकेडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात ५ टक्के कपात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी घोडबंदर मार्गावर गायमुख घाट ते चेना पूल परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. जड अवजड वाहनांना दुरुस्तीच्या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही या मार्गावर अवजड वाहतूक सुरू असल्याचे चित्र होते. त्यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना दोन तास लागत आहेत. अनेक वाहने एकाच ठिकाणी थांबून आहेत. दुपारी कडाक्याचे ऊन पडले असतानाच, कोंडीमुळे दुचाकीस्वारांचे हाल झाले आहेत. बसगाड्या, रिक्षा, मोटारीमधील प्रवासी कोंडी आणि घामाच्या धारांमुळे हैराण झाले आहेत.