ठाणे : अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश करण्याचा कार्यक्रम रद्द करत असल्याची घोषणा जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी करत तसे संदेश समजमाध्यमांवर धाडले होते. मात्र, रात्री त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी पक्ष प्रवेश केला. त्यामुळे आधी रद्दची घोषणा आणि नंतर मात्र पक्षप्रवेश केल्याची चर्चा रंगली असून विमान दुर्घटनेच्या दिवशी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

जिजाऊ संघटना ठाणे, पालघर जिल्ह्यासह कोकणात आरोग्य, शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून पोहोचली आहे. संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे हेही कोकणात एक वेगळा चेहरा म्हणून परिचित आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असले तरी नीलेश सांबरे यांचे राजकीय वर्तुळात चांगले वजन आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षात त्यांची उठबस आहे. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाही लपून राहिलेल्या नाहीत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या मतदार संघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला होता. त्यात पक्षांतर्गत विरोधासह जिजाऊ संघटनेचाही मोठा वाटा असल्याची चर्चा होती. सांबरे यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी नुकतेच एकनाथ शिंदे रत्नागिरीत पोहोचले होते. असे असतानाच, जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती.

गुरुवार, १२ जून रोजी ठाण्यातील वागले इस्टेट परिसरातील कियारा बॅंक्वेट हॉल येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांबरे हे पक्ष प्रवेश करणार होते. तसे संदेश सांबरे आणि शिवसेनेकडून समाजमाध्यमांवर धाडण्यात आले होते. परंतु दुपारी अहमदाबाद येथे विमान दुर्घटना घडताच, सांबरे यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रम रद्द करत असल्याची घोषणा केली आणि तसे संदेश समाजमाध्यमांवर धाडले होते. असे असले तरी जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते मात्र गुरुवारी सायंकाळी कियारा बॅंक्वेट हॉल येथे जमले होते. त्यानंतर प्रसार माध्यमांविनाच तिथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आणि यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांबरे यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत सांबरे

निलेश सांबरे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असले तरी यांचे राजकीय वर्तुळात चांगले वजन आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या संघटनेचे उमेदवार आणि त्यांनी स्वत: मोठा प्रभाव पाडला. निलेश सांबरे यांनी स्वतः भिवंडी लोकसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवली. वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर त्यांनी ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी भिवंडी तालुका आणि शहापूर तालुक्यात लक्षणीय मते घेतली. त्यांना एकूण २ लाख ३१ हजार मते मिळाली.कुणबी समाजाच्या मतांना आपल्याकडे वळवण्यात सांबरे यशस्वी झाल्याचे बोलले जाते. या मतांमुळे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला.