ठाणे : ऐरोली -काटई नाका उन्नत मार्गिकेच्या कामासाठी बसविण्यात आलेले गर्डर तिरपे झाल्याने ट्रान्स हार्बर मार्गिकेवरील रेल्वे वाहतुक साडे चार तास बंद होती. या कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गिकेच्या एकूण ५६ रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्याने नवी मुंबईत कामानिमित्ताने निघालेल्या नोकरदारवर्गाचे मोठ्याप्रमाणात हाल झाले. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने रस्ते वाहतुकीवर भार वाढून ठाणे- बेलापूर मार्गावरही कोंडी झाली होती.
ऐरोली -काटई नाका उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहे. ही मार्गिका ट्रान्स हार्बर मार्गावरून उन्नत जाते. शुक्रवारी पहाटे १ ते ४ या कालावधीत गर्डर उभारला होता. या मार्गिकेवरील १० वा गर्डर तिरपे झाल्याचे समोर आल्यानंतर ट्रान्स हार्बर मर्गावरील रेल्वे वाहतुक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ७.१० वाजेपासून रेल्वे वाहतुक पूर्णपणे बंद झाली.
नवी मुंबई शहरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, नाहूर, भांडूप भागातील लाखो नोकरदार ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे प्रवास करतात. अचानक रेल्वे सेवा बंद झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. रेल्वे सेवा बंद असल्याची उद्घोषणा सुरू होती. वाहतुक बंद करण्याचे नेमके कारण समजत नसल्याने काही प्रवासी रेल्वे स्थानकातच थांबले होते.
तर काही प्रवाशांनी रस्ते मार्गे नवी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. परंतु रस्ते मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. ठाणे बेलापूर मार्गावरील सिडको, कळवा नाका, विटावा, दिघा भागात वाहतुक कोंडी झाली होती. सिडको बस थांब्यावर प्रवाशांना बसगाड्या उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. तसेच रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लुटमार सुरू होती. ऑनलाईन सेवा पुरविणारी वाहने देखील प्रवाशांना वेळेत उपलब्ध होत नव्हती. गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ट्रान्स हार्बरची वाहतुक पूर्ववत झाली. ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतुक ठप्प झाल्याने ठाण्याहून वाशी, पनवेल, नेरूळच्या दिशेने जाणाऱ्या २८ आणि तेथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या २८ अशा ५६ रेल्वे सेवा रद्द झाल्या होत्या. या घटनेबाबत एमएमआरडीएने दिलगीरी व्यक्त केली.