Thane municipal corporation election 2025 / ठाणे : येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचना आराखड्यावर ३ सप्टेंबरपर्यंत केवळ ६० हरकती व सुचना नागरिकांनी दाखल केल्या होत्या. गणेशोत्सवात अनेकजण व्यस्त असल्यामुळे तक्रारींचा ओघ कमी असल्याचे बोलले जात होते. मात्र, गौरी-गणपती विसर्जन होताच, या उत्सवातून उसंत मिळालेल्या नागरिकांनी शेवटच्या दिवशी दोनशेहून अधिक तक्रारी दाखल केल्या असून यामुळे एकूण तक्रारींचा संख्या अडीचशेहून अधिक झाली आहे. दिवा, माजीवडा-मानपाडा आणि कोपरी भागातून सर्वाधिक तक्रारी आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे येत्या काही महिन्यात पालिकेची निवडणूक होणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली आहे. गेल्या म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती. त्यात ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. अशी एकूण ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक निवडून आले होते.
यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात आल्याने प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झालेले नाही. यात चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत ५० ते ६२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. तर, तीन सदस्यांचा प्रभाग ३८ हजार लोकसंख्येचा करण्यात आला आहे. या प्रारुप आराखड्यावर महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत.
हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत होती. आराखडा जाहीर होताच, प्रभाग सीमांबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र आराखड्यावर २ सप्टेंबरपर्यंत केवळ १६ तक्रारी दाखल झाल्या होत्या. गणेशोत्सवात अनेकजण व्यस्त असल्यामुळे तक्रारींचा ओघ कमी असल्याची शहरात चर्चा होती.
एका दिवसात ४४ तक्रारी
गौरी-गणपतीचे २ सप्टेंबर रोजी विसर्जन झाले, त्याची संख्या मोठी होती. गौरी आणि गणपती विसर्जनाच्या सातव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण १७९३९ मूर्तींचे विसर्जन झाले. त्यात, १६९४४ गणेश मूर्ती तर, ९९५ गौरी मूर्ती होत्या. त्यात, १२७ सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचाही समावेश होता. या विसर्जनानंतर गणेशोत्सवातून उसंत मिळालेल्या नागरिकांनी आता तक्रारी दाखल करण्यास सुरुवात झाली.
३ सप्टेंबर रोजी ४४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापाठोपाठ शेवटच्या दिवशी म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी दोनशेहून अधिक तक्रारी नागरिकांनी दाखल केल्या असून यामुळे एकूण तक्रारींचा संख्या अडीचशेहून अधिक झाली आहे. दिवा, माजीवडा-मानपाडा आणि कोपरी भागातून सर्वाधिक तक्रारी आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
दिवा प्रभागाविरोधात आक्षेप
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या वार्ड रचनेवर “सेव्ह दिवा फाउंडेशन”ने हरकत नोंदवली आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. रोहिदास मुंडे यांनी गुरुवारी आयुक्तांना सविस्तर निवेदन देऊन प्रभाग क्रमांक २७, २८, २९ आणि ३० मधील अन्यायकारक विभागणीविरोधात तीव्र आक्षेप नोंदवले. प्रभाग क्रमांक २९ मध्ये २७ आणि २८ मधील भागांचा जबरदस्ती समावेश करण्यात आला आहे. यामुळे भौगोलिक सलगता तुटली असून लोकसंख्या असमतोल निर्माण झाला आहे. परिणामी प्रभाग क्रमांक ३० वर १५ ते १८ टक्के अतिरिक्त लोकसंख्येचा भार पडला आहे. “ही विभागणी पूर्णपणे कायदेशीर निकषांच्या विरोधात असून जनतेच्या न्याय्य प्रतिनिधित्वावर सरळ आघात आहे,” असे मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
भाजपची मुदत वाढविण्याची मागणी
दिव्यातील प्रभाग रचनेविरोधात भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष विजय भोईर यांनीही आक्षेप नोंदविले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक गावी गेलेले असून अनेकांना संबंधित माहिती वेळेवर उपलब्ध झाली नाही. अनेक लोक गावी गेले असताना स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रारूप रचना प्रकाशित करणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. त्या रचनेवर हरकत घेण्यासाठी नागरिकांना संधी मिळाली नाही.
महापालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकारी यांनी ही संपूर्ण प्रक्रिया सर्वसमावेशक स्वरूपात राबवावी. केवळ ठराविक गटाला लाभ होईल अशा पद्धतीने नियोजन होऊ नये. ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने बरेच नागरिक त्यानंतरच परत येतील, याची दखल घेऊन हरकती दाखल करण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.