ठाणे : येथील वर्तकनगर भागातील सुनितीदेवी सिंघानिया शाळेच्या आवारात एका नव्या इमारतीचे काम सुरु आहे. या बांधकामामुळे शाळेत डासांचा प्रादूर्भाव वाढला असून याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे.या अर्धवट बांधकाम झालेल्या इमारातीत शाळा प्रशासनाकडून काही वर्ग भरवले जात आहे. या बांधकामामुळे शाळेतील जवळ पास २५ हून अधिक विद्यार्थ्यांना ताप येत आहे. यातील सात ते आठ विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाली आहे, अशी माहिती काही पालकांकडून देण्यात आली. यावर उपाय योजना करा असे पालकांकडून शाळा प्रशासनाला सांगतिले जात आहे. परंतू, शाळाप्रशासन याकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्यामुळे पालक वर्गाकडून संताप व्यक्त होत आहे.
वर्तकनगर भागातील रेमंड कंपनी जवळ सुनितीदेवी सिंघानिया शाळा आहे. आयसीएसई बोर्डाची ही शाळा असून या शाळेचे वर्ग जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भरण्यास सुरुवात झाली. या शाळेच्या आवारात नव्या इमारतीचे काम सुरु आहे. परंतू, या इमारतीच्या बांधकामामुळे शाळेच्या आवारात तसेच वर्गखोल्यांमध्ये मोठ्याप्रमाणात डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. शाळा सुरु झाल्यापासून शाळेतील विद्यार्थ्यांना तापाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास २५ हून अधिक विद्यार्थ्यांना तापाची लागण तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शरिरावर पुरळ उठल्याच्या तक्रारी पालकांकडून येत आहेत.
वारंवार ताप येत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी सात ते आठ विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. हा आकडा अधिक असल्याची शक्यता पालकांकडून वर्तवली जात आहे. शाळा प्रशासनाकडून अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत इयत्ता चौथी आणि पाचवीचे वर्ग भरवले जात आहे. या बांधकामामुळे विद्यार्थ्यांना घशाचा संसर्ग, सर्दी, ताप शरिरावर पुरळ याचा त्रास होऊ लागला असल्याची माहिती एका पालकाकडून नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. शाळेतील काही शिक्षक देखील या बांधकामामुळे आजारी असल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात, शाळा प्रशासनासोबत ई-मेल तसेच दुरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांच्याकडून सायंकाळी उशिरापर्यंत प्रतिसाद मिळू शकला नाही.
पालक प्रतिक्रिया
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत विद्यार्थ्यांचे वर्ग भरवून शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. या इमारतीचे बांधकाम सुरु असे पर्यंत शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घ्यावे किंवा दुसरी काही तरी व्यवस्था करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया एका पालकांने दिली.
शाळा परिसरात अनेक बांधकामे सुरू आहेत. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी होती. या शाळेतील अनेक विद्यार्थी आजारी पडल्याने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे याठिकाणी जाऊन शाळा व्यवस्थापनाने काळजी घेतली होती का, याची चौकशी करावी अशी मागणी ठाणे महापालिका उपायक्त आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. – संजय केळकर, आमदार
सुनितीदेवी सिंघानिया शाळेत घडलेल्या प्रकरणात ठाणे महापालिका शिक्षणाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालावे आणि जोपर्यंत योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत शाळेत मुलांना बोलवू नये असे आदेश द्यावेत. – संदीप पाचंगे, सरचिटणीस मनसे.
ठाणे महापालिका आरोग्य विभागाकडून या शाळेची पाहणी करण्यात आली. महापालिकेकडून शाळेला नोटीस बजावली आहे. शाळेतील किती विद्यार्थी तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना या बांधकामाची बाधा झाली आहे आणि शाळा प्रशासन स्वत: यावर काय उपाययोजना करत आहे याचा अहवाल मागवला आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने शाळेत योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. – डॉ. प्रसाद पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठाणे महापालिका