ठाणे: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेश प्रक्रियेतील तिसरी प्रतिक्षा यादीत ३२३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना ७ मे पर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली होती. परंतु, ७ मे पर्यंत यापैकी केवळ १२५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.

अनेक पालकांकडून अद्याप प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे या टप्प्यातील प्रवेशासाठी १४ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वंचित, दुर्बल घटकातील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. २०२५-२६ य़ा शैक्षणिक वर्षासाठी मागील चार महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

ठाणे जिल्ह्यात ६२७ शाळेतून ११ हजार ३२२ जागांवर आरटीई प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेला १४ जानेवारी पासून सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यातून २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. यातून, सुरुवातीला १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ ६ हजार ७०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.

त्यानंतर, उर्वरित जागांसाठी पहिली प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली. त्यात, २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी १ हजार १८५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर, दुसऱ्या प्रतिक्षा यादीत ९५५ विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यातील केवळ ४६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यांनतर तिसरी प्रतिक्षा यादी जाहीर झाली. त्यात ३२३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ७ मे पर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. परंतू, त्यापैकी केवळ १२५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित केले आहेत. अद्यापही आरटीई प्रवेशाच्या काही जागा रिक्त असल्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १४ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी, पालकांनी लवकारत लवकर पाल्याचे प्रवेश निश्चित करावे असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

यापुढे मुदतवाढ नाही

प्रवेश प्रक्रियेसाठी १४ मे ही अंतिम मुदत असून, या नंतरची कोणतीही विनंती ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच यापुढे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ होणार नाही. त्यामुळे पालकांनी योग्य ती काळजी घेऊन प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाच्या सर्वसमावेशक शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पालकांनी वेळेत प्रतिसाद देणे गरजेचे आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संधी वाया जाऊ नये, यासाठी मुदतवाढ दिली आहे. – रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे.