कल्याण: कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई येथील उड्डाण पुलाचे काम काही तांत्रिक कामे आणि अचानक सुरू झालेल्या वळिवाच्या पावसामुळे रखडले. रहदारीसाठी महत्वाचा असलेला हा पूल येत्या महिन्याच्या जून अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिली.

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक, काटई नाका या भागात स्थानिक रस्ते बाधित शेतकऱ्यांना शासनाने अद्याप मोबदला दिलेला नाही. त्यामुळे शेतकरी या भागातील रस्ता रूंदीकरण आणि सीमेंट काँक्रीट कामास विरोध करत आहेत. काटई, मानपाडा, गोळवली, सोनारपाडा, देसई, खिडकाळी भागात या अरूंद रस्त्यामुळे हे भाग सर्वाधिक कोंडीचे आहेत. या भागांच्या पुढील भाग रस्ते भाग हे तीन पदरी झाले आहेत. त्यामुळे कल्याण फाटाकडून वाहने तीन पदरी मार्गिकेतून पलावा चौक दिशेने येतात. परंतु काटई परिसरातील भागात रस्ता रूंदीकरण झाले नसल्याने चालकांना दोन पदरी मार्गिकांमधून वाहने चालवावी लागतात. तीन पदरी मार्गिकेतून आलेली वाहने अचानक दोन पदरी मार्गिकेत आल्यावर काटई, पलावा चौक भागात वाहन कोंडी होते.

पलावा चौक ते काटई रस्त्या दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. हे काम यापूर्वीच्या पाहणीच्यावेळी मे अखेरपर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. काही तांत्रिक अडथळे, मध्येच सुरू झालेला पूर्वमोसमी पावसामुळे या कामांमध्ये पुन्हा अडथळा आला. ही कामे पूर्ण होण्यास अद्याप २५ दिवस लागणार असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी आमदार राजेश मोरे यांना दिले आहे.

आमदार राजेश मोरे यांनी एमएसआरडीसीचे अधिकारी, ठेकेदार यांच्या उपस्थितीत बुधवारी काटई उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी पुलाची काही तांत्रिक कामे शिल्लक असल्याचे अधिकाऱ्यांनी आमदारांना सांगितले. पाऊस सुरू होण्यापूर्वी हा पूल सुरू होणे खूप आवश्यक आहे. हा पूल सुरू झाल्यामुळे पलावा चौक भागातील उड्डाण पुलांवर होणारी कोंडी टळण्यास मदत होणार आहे. शिळफाटा रस्त्यावर गेल्या महिन्यापासूुन खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने हे खड्डे पाण्याने भरले. या खड्ड्यांमधून सतत वाहने गेल्याने या खड्ड्यांचे आकार वाढले आहेत. हे खड्डे प्रवाशांना आणि वाहतूक पोलिसांना डोकेदुखी झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही खड्डे भरण्याची कामे लवकर हाती घ्यावीत म्हणून कोळसेवाडी वाहतूक विभागाने गेल्या २५ दिवसांपासून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पत्रव्यवहार करून तगादा लावला आहे. हे अधिकारी वाहतूक विभागाला दाद देत नसल्याच्या तक्रारी आहेत. याप्रकरणात खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांनी लक्ष घालून एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना शिळफाटा रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश देण्याची मागणी प्रवासी करत आहेत. या पाहणीच्यावेळी डोंबिवली शिवसेना शहर सचिव संतोष चव्हाण, स्वीय साहाय्यक सतिश मोडक, युवा सेना पदाधिकारी रोहित म्हात्रे, एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते.