ठाणे: ठाणे आणि नवी मुंबई शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे ते वाशी, पनवेल, नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक शुक्रवारी ऐन सकाळी सात वाजताच्या सुमारास ठप्प झाली. यामुळे कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाने अखेर टिएमटीने नवी मुंबईची वाट धरली. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ठाणे परिवहन प्रशासनाने ठाणे सॅटिस पुल ते घणसोली आणि तुर्भे अशा १८ जादा बस गाड्या सोडल्या. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला.

ऐरोली स्थानकाजवळील उन्नत मार्गावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गर्डर बसविण्याचे काम केले. मात्र, गर्डर तिरके झाल्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक ठप्प झाल्याने ऐन सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाचे हाल झाले. नवी मुंबईत मोठ्याप्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या तसेच कारखाने आहेत. याठिकाणी ठाणे ते कर्जत कसारा आणि मुलुंड, भांडूप भागातील नागरिक काम करतात. हे नागरिक ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईत प्रवास करतात.

परंतु, शुक्रवारी ऐन सकाळी ७ वाजताच्या सुमारास या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा फटका नोकरदार वर्गाला मोठ्या प्रमाणात बसला. कार्यालयात पोहोचायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता. ठाणे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने अनेकांनी टिएमटी बसगाड्यांमधून नवी मुंबईच्या दिशेने वाट धरली. यामुळे टिएमटी थांब्यांवर प्रवाशांचा भार वाढल्याचे लक्षात येताच टिएमटी प्रशासनाने ज्यादा गाड्यांचे नियोजन केले. ठाणे ते घणसोली आणि तुर्भे या मार्गावर टीएमटीने ज्यादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दररोज इतक्या फेऱ्या नवी मुंबईत

ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत दररोज नवी मुंबईत वेगवेगळ्या मार्गावर १३ बस धावतात. या बस गाड्यांच्या दिवसाला ४० ते ५० फेऱ्या होतात. त्यातील आनंदनगर ते बेलापूर आणि आनंदनगर ते महापे (बिझनेस पार्क) या मार्गावर ८ गाड्या धावत असून या गाड्यांच्या दिवसाला एकूण ३० फेऱ्या होतात. तर, दिवा ते वाशी आणि खारेगाव पारसिक ते वाशी अशा पाच गाड्या धावतात त्यांच्या दिवसाला एकूण २० ते २२ फेऱ्या होत असतात. या बस फेऱ्या देखील शुक्रवारी नियमित सुरु होत्या. या व्यतिरिक्त आणखी १८ बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या, अशी माहिती ठाणे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.