बदलापूर: कल्याण तालुक्याच्या ग्रामीण हद्दीतील विविध गावांमध्ये सध्या महापारेषांच्या माध्यमातून विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम सुरू करताना स्थानिक शेतकऱ्यांना कोणतीही सूचना, नोटीस अथवा मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. महापारेषण विभागाने जबरदस्तीने काम करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी नुकतीच शेतकऱ्यांनी कल्याण तालुक्यातील वाहोली गावात आंदोलन केले. तसेच महापारेषण अधिकाऱ्यांना निवेदनही दिले.
कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील खडवली, चिंचवली, उतणे, रुंदे, म्हस्कळ, गोवेली, वाहोली, वसत, शेलवली यांसह १३ गावातून महापारेषण कंपनीची विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम करत असताना कंपनीकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुचना, नोटीसा देण्यात आलेल्या नाहीत. तसेच कोणताही मोबदलासुद्धा देण्यात आलेला नाही. जबरदस्तीने महापारेषण काम करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या कामाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यानी पाठिंबा दर्शविला आहे. शनिवारी शेतकऱ्यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहोली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू. आधी शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला द्या मगच काम करा असा इशारा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते अल्पेश भोईर यांनी दिलाय. यावेळी तालुक्यातील शेकडो बाधीत शेतकरी व विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे पत्र देण्यात आले.
प्रकल्पाला विरोध नाही, पण…
नुकत्याच झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी महापारेषण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपली भूमिका मांडली. आमच्या शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकल्पाला विरोध नाही. प्रकल्पासाठी जमिनी देण्यासाठी आम्हीही तयार आहोत. त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. मात्र या कामामध्ये शेतकरी केंद्रबिंदू असायला हवा. कोणतेही काम सुरू करताना स्थानिकांना विश्वासात घेतले जावे. कामासाठी किती जागा आवश्यक आहे त्याची सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, महापारेषण आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त मोजणी व्हावी. त्यानंतर आवश्यक जागेचा मोबदला देण्यासाठी त्याचा दर निश्चित व्हावा आणि अखेर त्याचा मोबदला दिल्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरू करावे. या प्रक्रिया पूर्ण न केल्यास आम्ही आमच्या जागेत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच आमचा प्रकल्पाला विरोध नाही, तर चुकीच्या प्रक्रियेला विरोध आहे असेही शेतकऱ्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे .