कल्याण : कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील राज्य परिवहन महामंडळाचे एस. टी. बस आगार, बाजुचा वल्लीपीर रस्ता भुरट्या चोरट्यांचे आश्रयस्थान झाले आहे. दररोज बस आगारातील ज्येष्ठ महिला प्रवाशांच्या हातामधील सोन्याच्या बांगड्या, प्रवाशांच्या हातामधील मोबाईल चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी संध्याकाळी एका प्रवाशाचा महागडा मोबाईल चोरट्यांनी लांबवला.
आपला महागडा मोबाईल गायब होताच, अस्वस्थ झालेल्या कल्याण पूर्वेतील चक्कीनाका चेतन हायस्कूल परिसरात राहणाऱ्या संतोष साळवे या नागरिकाने कल्याणहून वाशीकडे जाणाऱ्या वातानुकूलित बसला धावपळ करत रोखून धरले. घटनास्थळी पोलिसांना पाचारण केले. बसमध्ये कोणी प्रवासी चोरटा आहे का याची खातरजमा केली. चोरट्यांनी संतोष यांचा मोबाईल चोरून पलायन केले होते. त्यामुळे महागडा मोबाईल हाती लागला नाही.
दिवाळी सण, मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात कल्याण रेल्वे स्थानक, एस. टी. बस आगारात प्रवाशांची गर्दी असते. या कालावधीत अनेक प्रवासी हातात, गळ्यात सोन्याचा ऐवज परिधान करून प्रवास करतात. अशा ऐवज घातलेल्या ६० वर्षावरील महिला, पुरूष प्रवाशांना लक्ष्य करून भुरटे चोरटे बसमध्ये प्रवासी म्हणून चढताना ऐवज असलेल्या प्रवाशाच्या हातामधील, गळ्यातील सोन्याचा ऐवज लांंबून पसार होतात. मागील अनेक वर्षापासूनचा हा प्रकार आहे. एसटीचे अधिकारी, तेथील सुरक्षा अधिकारी याविषयी उदासीन असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसतो.
चक्कीनाका येथे राहणारे संतोष साळवे यांची पत्नी शिळफाटा भागात आपल्या माहेरी सोमवारी संध्याकाळी चालली होती. संतोष कल्याणमध्ये वाशी बस स्थानकावर पत्नीला सोडण्यासाठी आले होते. कल्याण वाशी बसमध्ये पत्नीच्या पिशव्या चढवून दिल्यानंंतर संतोष बसमधून खाली उतरले. उतल्यानंतर त्यांनी विजारीच्या खिशातील मोबाईलला हात लावला तर खिशात मोबाईल नव्हता. महागडा मोबाईल बसमधील चोरट्याने चोरल्याचा संशय घेत संतोष यांनी बसमधील प्रत्येक प्रवाशाच्या पिशवीची झडती घेण्यासाठी बस रोखून धरली. पोलिसांना बस थांब्यावर पाचारण केले.
संतोष यांनी स्वत, पोलीस, वाहकाने प्रवाशांच्या पिशव्या तपासल्या. मोबाईल आढळला नाही. या तपासणीनंतर बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. मोबाईल गहाळ झाला म्हणून बस रोखून धरल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
गेल्या दहा दिवसाच्या कालावधीत कल्याण एस. टी. आगारातून सहाहून अधिक महिला प्रवाशांच्या हातामधील सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेल्या आहेत. सोमवारी संध्याकाळी पनवेल पळस्पे येथे राहणाऱ्या रेखा दामोदरे (६४) या कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर चौक येथे एस. टी. बसमध्ये पनवेलला जाण्यासाठी गर्दीतून चढत होत्या. संध्याकाळी सातची वेळ होती. या गर्दीत रेखा यांच्या उजव्या हातामधील सोन्याची बांगडी कटरने तोडून चोरट्याने दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. बसमध्ये चढल्यावर रेखा यांच्या चोरीचा प्रकार निदर्शनास आला. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांगरूळ येथील रहिवासी बाळाराम शेलार यांच्या गळ्यातील सोन्याची ८० हजार रूपयांची सोन साखळी दोन भुरट्यांनी मलंग रोडवरून जात असताना चोरून नेली.