ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. पावसामुळे रात्री घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. ठाणे शहरात ठिकठिकाणी वाहतुक कोंडी झाली होती. रस्त्यावर पाणी तुंबले होते. कल्याण, बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्येही पाऊस सुरु होता. काही भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

ठाणे शहरात मंगळवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. मुंबईहून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावर माजिवडा ते नितीन कंपनी पर्यंंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटात रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. त्यामुळे येथील वाहतुकीवर परिणाम झाला. त्यातच पाऊस पडल्याने कोंडीत आणखी भर पडली. माजिवडा ते कापूरबवावडी भागात गटाराचे पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले होते.

माजिवडा भागातील बसथांब्यावर गटाराचे पाणी साचल्याने तेथील प्रवाशांना पाण्यात उभे राऊन बसगाड्यांची प्रतिक्षा करावी लागली. अंतर्गत मार्गांवरही कोंडी झाल्याने वाहन चालकांना वेळेत घरी पोहचता आले नाही. वाहतुक कोंडीत बसगाड्या अडकल्या होत्या. त्यामुळे सॅटीस पुलावर प्रवाशांना वेळेत बसगाड्या उपलब्ध होऊ शकल्या नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सॅटीस पुलावर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. रिक्षा थांब्यावरही प्रवाशांची गर्दी झाली होती. ठाण्यातील सखल भागात ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबले होते. गोकुळनगर, मुक्ताईनगर, घोडबंदर भागासह अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. कल्याण डोंबिवली शहरातील सखल भागांमध्ये रात्री पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. तर अंबरनाथ, बदलापूर भागात रात्री रिमझिम पाऊस पडत होता. विजांच्या गडगडाट अधिक होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते.