झाडांची छाटणी ही खरे म्हणजे माणसाने त्याच्या गरजेनुसार केलेली गोष्ट आहे. त्यामागे अनेक उद्दिष्टे असतात. अर्थात हे काही त्याला एकाएकी समजले नाही. चुका आणि अनुभवांमधून हे तंत्र विकसित झाले आहे.
मुळात छाटणीची गरज का भासली? त्याचे मुख्य कारण म्हणजे छाटणीमुळे आपण झाडांपासून अधिक फायदे मिळवू शकतो. झाडाचा आकार आपल्याला हवा तसा ठेवणे, झाडाचे पुनरुत्पादन, पुनर्जीवन करणे, योग्य वेळी फुले आणणे, रोगट फांद्या तोडून झाडाचे आरोग्य सुधारणे, आपल्याला हव्या असलेल्या बाजूला झाड वाढविणे, धोकादायक फांद्या कापणे, झाडाला जास्तीत जास्त फांद्या आणणे आदी विविध कारणांसाठी झाडांची छाटणी केली जाते.
छाटणीसाठी अनेक प्रकारच्या कात्र्या, कोयते, विजेवर, पेट्रोलवर चालणारी यंत्रे अशा अनेक प्रकारच्या अवजारांचा वापर केला जातो. छाटणी करण्यासाठी वापरली जाणारी शस्त्रे धारदार असावीत. ती र्निजतुक करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे छाटणी करताना फांदी चिरणार नाही, किंवा छाटणी करताना मूळ झाडाची साल निघणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
अर्थात झाडांची छाटणी किती करायची हे उद्दिष्टानुसार ठरते. या ठिकाणी आपला हेतू महत्त्वाचा ठरतो. पावसाळ्यापूर्वी वीज खात्याचे किंवा नगरपालिकेचे कर्मचारी विजेच्या वायरला टेकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटून टाकतात. तसेच रस्त्यावर खूप झुकलेल्या फांद्या कापून टाकल्या जातात. जेणेकरून वादळवाऱ्यासह पाऊस कोसळत असताना झाडाच्या फांद्या विजेच्या तारेवर अथवा रस्त्यावर पडून अपघात होऊ नयेत. आपल्या आवारातील झाडांची छाटणी करायची असेल तरी नगरपालिकेकडून तशी परवानगी घ्यावी लागते.
ज्या झाडांच्या फांद्यांपासून नवीन झाडे लावता येतात, त्यांची छाटणी दोन-चार पाऊस पडून गेल्यावर करतात. काही झाडांच्या कोवळ्या फांद्या, शेंडे यांच्यापासून जास्तीत जास्त रोपे (अडुळसा, बिंगोनिया इ.) तयार केली जातात. परंतु बहुतेक झाडांच्या जून फांद्या लागवडीसाठी वापरल्या जातात. कारण त्यांच्या कोवळ्या फांद्यांना मुळे फुटत नाहीत. साधारण चॉकलेटी, हिरवट आणि राखाडी फांद्यांनाच मुळे येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात हवेत आद्रतेचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबरच जमिनीत उष्णता असते. खरे म्हणजे हवा अधिक उष्णता अधिक ओलावा याच्या योग्य प्रमाणालाच वाफसा म्हणतात. अशा परिस्थितीत लागवडीसाठी वापरावयाच्या फांद्यांना मुळे फुटू शकतात. लागवडीपूर्वी फांदीवरील सर्व पाने, देठ तोडून टाकावेत. त्यानंतर मुळाकडची बाजू कॅरेडॅक्सच्या पावडरमध्ये बुडवून लावली असता त्यांना चांगली मुळे येतात. फांदी तोडल्यानंतर तो जो वरचा कापलेला भाग असतो, त्या खपलीवर कोणतेतरी बुरशीनाशक अथवा जंतूनाशक लावावे. त्यामुळे बुरशी आत जाऊन झाड मरणार नाही. नवे रोप लवकर तयार होते.
झाडांना विशिष्ट आकार देण्यासाठीही छाटणी करतात. उदाहरणार्थ रस्त्यामध्ये दुभाजक म्हणून असणाऱ्या वनस्पती. बागेमध्ये अनेकदा काही वनस्पतींची छोटी हिरवी भिंत असलेली आपण पाहतो. ठरावीक उंची आणि रुंदी ठेवण्यासाठी या झाडांची नियमित छाटणी करावी लागते. साधारण एक ते दोन महिन्यांच्या अंतराने अशा प्रकारची छाटणी करतात. त्याचप्रमाणे फांद्या छाटून झाडांना हत्ती, जिराफ, उंट असे निरनिराळे आकारही दिले जातात. काही वेळा त्यासाठी सांगाडय़ांचा वापरही करतात. त्या सांगाडय़ानुसार मग झाडांची छाटणी करतात. जपानमध्ये बाबूंची छाटणी करून त्यांना कलात्मक आकार दिले जातात. त्यांना फेनशुई असे म्हणतात.
कुंडीतील झाडांची दर दोनतीन वर्षांनी छाटणी करून त्यांची वाढ आणि आकार नियंत्रित करता येते. तसेच कुंडी बदलताना, छोटय़ा कुंडीतून मोठय़ा कुंडीत झाड लावताना झाडाच्या फांद्यांबरोबरच त्याच्या मुळांचीही काही प्रमाणात छाटणी केली जाते. अकार्यक्षम मुळे काढून टाकणे हा यामागचा उद्देश असतो. हंगाम संपल्यानंतर योग्य प्रकारे फांद्या आणि मुळांची छाटणी करून आपण वांगी-मिरचीचे पीक सलग दोन-तीन वर्षे सहजपणे घरच्या घरी घेऊ शकतो. द्राक्ष आणि डाळिंबाचे पीक दरवर्षी मिळावे म्हणून त्याच्या रोपांची छाटणी करतात. छाटणी केल्यानंतर साधारण ४० ते ९० दिवसांत झाडांना नवी पालवी फुटते. अर्थात पालवी येण्याचे प्रमाण आणि वेळ झाडाच्या वयावर अवलंबून असते. नव्या पालवीला कीड लागण्याचा धोका असतो. त्यामुळे वातावरणात कीड नसलेल्या काळात पालवी येणे अधिक चांगले. त्यामुळे साधारणत: ऑक्टोबरमध्ये झाडांची छाटणी करावी. कारण पुढे येणाऱ्या थंडीत वातावरणातील किडीचे प्रमाण अत्यल्प असते.
सीताफळासारख्या झाडांची ती सुप्तावस्थेत गेल्यावर अथवा पानगळ झाल्यावर छाटणी करावी. पेरूसाठी छाटणीचे नवे तंत्र विकसित झाले आहे. त्याला मिडोऑर्चिड असे म्हणतात. त्यात अगदी जवळजवळ पेरूची रोपे लावली जातात. छाटणीद्वारे आंब्याचा आकार, उंची आणि विस्तार मर्यादित करून आपण हेक्टरी झाडांची संख्या वाढवू शकतो. अशा लागवड पद्धतीस घन लागवड किंवा अति घन लागवड, असे म्हणतात. (हाय डेन्टीसी आणि अल्ट्रा डेन्टीसी) वेलवर्गीय भाज्यांमध्ये मांडवाच्या प्रकारानुसार छाटणी करतात. उभ्या मांडवात दोन फूट उंचीपर्यंत वेलीच्या बगलफुटी छाटतात. छातीएवढय़ा उंचीवर वेल वाढल्यावर त्याचा शेंडा कापतात. असे केले नाही तर शेंडय़ाच्या प्रभावामुळे वेल वाढतच राहतो. त्यामुळे फळधारणा लांबणीवर पडते. तसेच आडव्या मांडवावर वेल मांडवापर्यंत आल्यावर तिचा शेंडा कापतात. त्यामुळे त्यानंतर येणाऱ्या बगलफुटी मांडवावर आडव्या पसरतात. या छाटणीच्या प्रकारास वेलवृद्धीसाठी छाटणी असे म्हणतात.
नवी फळझाडे लावल्यावर साधारणफूट-दीड फूट उंचीवर त्याचा शेंडा कापला तर त्याला तीन ते सहा नवीन फुटी येतात. पुढील फुटीच्या काळातही शेंडा कापला की पुन्हा तीन ते चार फुटी येतात. त्यामुळे फळे जास्त येतात. फुलझाडांमध्ये मोगरा, गुलाब, जाई, जुई आदी रोपांची छाटणी केल्यानंतर नवीन फुटी येतात. या नव्या फुटींनाच फुले येतात.
शाखीय छाटणी : गच्च झालेल्या पानोळ्यामुळे रोग व कीड येण्याची शक्यता असते. अशा वेळी हलकी छाटणी करून विरळणी करतात. त्यामुळे सूर्यप्रकाश व हवा झाडाच्या खोडापर्यंत पोचते. छाटणी कोणत्याही उद्देशाने केली असली तरी छाटणी झाल्यावर बुरशी व कीडनाशकाची फवारणी करणे आवश्यक असते. झाडे थोडीच असतील तर त्याच्या फांद्यांच्या छाटलेल्या भागावर ब्रशने औषध लावावे. मोठय़ा प्रमाणात असेल तर फवारणी करावी. आकाराणे नियंत्रित ठेवणे, फुले आणि फळांचे प्रमाण वाढविणे, झाडाचे आरोग्य चांगले राखणे आदी उद्दिष्टे छाटणीमुळे साध्य होतात.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2015 रोजी प्रकाशित
झाडांची छाटणी
झा डांची छाटणी ही खरे म्हणजे माणसाने त्याच्या गरजेनुसार केलेली गोष्ट आहे. त्यामागे अनेक उद्दिष्टे असतात. अर्थात हे काही त्याला एकाएकी समजले नाही.

First published on: 09-07-2015 at 07:11 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree pruning