ठाणे : गणेशोत्वानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे रेल्वे गाडीतील आरक्षण निश्चित व्हावे आणि त्यांचा कोकणचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशातून ठाणे रेल्वे स्थानकात दोन अतिरिक्त खिडक्या सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे आरक्षण खिडक्यांवर होणारी गर्दी विभागली जाणार आहे. यामुळे कोकणवासियांची वेळ वाचणार असून त्याचबरोबर रांगेत जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोकणात गणेशोत्व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबईतील अनेकजण कोकणात गणेशोत्वासाठी जातात. कोकणात गणेशोत्वासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. रेल्वे गाडी, राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये काही महिने आधीच आरक्षण सुरू होते. मात्र, तिकीट खिडक्या लांब रांगा लागतात आणि यामध्ये नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागते. अनेकदा आरक्षणही मिळत नाही. यामुळे नागरिकांना खासगी वाहनाने कोकणचा प्रवास करावा लागतो.
बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र आरक्षण खिडक्यांची नगण्य संख्या आणि लांब रांग यामुळे कोकणवासीय मेटाकुटीला येतात. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेले चार वर्ष लावून धरली होती. संघटनेने ही मागणी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केली होती. त्यावर गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के दिली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु होणार आहे. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे ६ मे २०२५ रोजी पत्रव्यवहार केला. या पत्राची तातडीने दखल घेत २ जून २०२५ रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे दोन अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरु करत असल्याची माहिती दिली आहे. २० जून ते ५ जुलै २०२५ या दरम्यान या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु राहणार आहेत.
सध्या ४ आरक्षण खिडक्या कार्यरत असून २ अतिरिक्त खिडक्या सुरु होणार आहेत. ६ आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांची वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नसल्याने प्रवासी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे.