ठाणे : मे महिन्याच्या अखेरीस प्रामुख्याने धरणक्षेत्रात पावसाची प्रतीक्षा केली जाते. मात्र यंदा या उलट चित्र झाले असून गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे बारवी धरणात आठवड्याभरातच लक्षणीय वाढ झाली आहे. एक आठवड्यापूर्वी बारवी धरणातील पाणीसाठा ११२.३१ दशलक्ष लिटर इतका होता तर गेल्या सात दिवसांच्या कालावधीत यात वाढ होऊन सध्या बारवी धरणात १२२.४५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. तर आंध्रा धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून सध्या १३५.९२ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा धरणात आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर सर्वत्र पावसाची जोरदार हजेरी लागते. यावेळी धरणांच्या पाणी साठ्यात देखील वाढ होण्यास सुरुवात होते आणि शहरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार नाहीशी होते. यामुळे धरणक्षेत्रात कायमच मुसळधार पावसाची प्रतीक्षा केली जाते. यंदा मे महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची झळ बसत होती.

विविध ठिकाणी टँकरवर अवलंबवून राहावे लागत होते. मात्र गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर धरणक्षेत्रातही याच पद्धतीने पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. जिल्ह्यातील नागरी वसाहती तसेच औद्योगिक वसाहतींना मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणातून आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंध्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही धरणामध्ये पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे.

३३८.८४ – दशलक्ष लिटर बारवी धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता

३३९.१४ – दशलक्ष लिटर आंध्रा धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता

१२२.४५- दशलक्ष लिटर अर्थात ३६.१४ टक्के पाणीसाठा बारवी धरणात

१३५.९२ – दशलक्ष लिटर अर्थात ४०.०८ टक्के इतका पाणीसाठा आंध्रा धरणात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी याच कालावधीत बारवी धरणातील पाणीसाठा २९ टक्के होता. यात यंदा सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.