जणू विनाशाचं रुप घेऊनच वादळं येतात. घोंगावत पुढे जाणाऱ्या वादळाच्या वाटेत येणारी झाडं, घरं. उन्मळून पडतात. जमीनदोस्त होतात. वर्षानुवर्षे जपलेल्या वास्तू आणि झाडांचं उरतं फक्त अवशेष आणि त्यासोबतच्या आठवणी! हे सगळं आता सांगण्याचं कारणही असंच आहे. दोन दिवसांपूर्वी तौते चक्रीवादळ अरबी समुद्रातून धावत गुजरातकडे निघून गेलं. पण, या वादळाने केरळच्या किनारपट्टीपासून गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत सगळीकडे विस्कटून ठेवलं. रुईयाच्या प्रांगणात असलेल्या एका झाडालाही हे चक्रीवादळ लोळवून करून पुढे गेलं. महाविद्यालयाच्या प्रांगणातील इतर झाडांप्रमाणेच हे झाडं असलं, तरी त्याच्यासोबत आठवणी वेगळ्या आहेत. या झाडाखाली नाट्य आणि कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा कट्टा भरायचा. वादळाने हा कट्टात उद्ध्वस्त केलाच, पण ज्याच्या छायेत नाट्य कलेच्या चर्चा झडल्या. कलाकार घडले, त्या सगळ्याचं साक्षीदार असलेलं झाडही कोसळलं. देशात करोनाचं संकट असतानाच चक्रीवादळही अधूनमधून दारावर थापा देत आहे. गेल्या वर्षीच्या चक्रीवादळानंतर यंदा तौते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून गेलं. याचा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांनाही जबर फटका बसला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ठिकठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. असंच एक झाड मुंबईतील रुईया कॉलेजजवळ पडलं. हे झाडं पडल्यानंतर काहीजणांनी याचा फोटो शेअर केला. जमिनीतून उसवून पडलेल्या या वृक्षाचा हा फोटो बघून अनेकांनी आठवणींना उजाळा दिला. या झाडाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकांच्या डोळ्यात पाणीही आलं. या झाडाच्या सावलीत अनेक दिग्गज घडले ते झाड असं वादळामुळे कोसळेलं बघून अनेकांच्या मनाचा कोपरा हळहळला. दिग्दर्शक, अभिनेता अनिकेत पाटीलने सोशल मीडियावर रुईया कॉलेजच्या कोसळलेल्या झाडाचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. 'किती तरी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते त्याच्या सावलीत घडले, खुप वर्षाच्या नाट्य, सिनेमा विषयक चर्चेचा एकमेव मूक साक्षीदार आज कोसळला' अशा भावना अनिकेतने व्यक्त केल्या आहेत. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनिकेत नाही तर व्हॉट्सअपवर रुईयामधील आजी माजी विद्यार्थ्यांनी हा फोटो स्टेटवर ठेवण्याबरोबरच त्या कट्ट्यावरील आठवणींनाही उजाळा दिलाय. अतिरौद्रवतार धारण केलेल्या तौते चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसला आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली होती. मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली होती. मोनो रेलची सेवा स्थगित करण्यात आली होती. वांद्रे-वरळी सी लिंकवरून होणारी वाहतुकही रोखण्यात आली होती. अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी बोटी नांगरून ठेवल्या होत्या. मात्र रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह धडकलेल्या मोठंमोठ्या लाटा व वादळामुळे बोटींचे दोर तुटून बोटी थेट किनाऱ्यावर आदळून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.