देशातील शहरी भागात काम करणाऱ्या सुमारे ३५ टक्के वर्किंग वुमन्सला (काम करणाऱ्या महिला) दुसरं मूल नकोय. या महिलांनी दुसऱ्या मुलासाठी वेळ देता येत नसल्याचे कारण पुढे केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

लग्नसंबंधातील ताणतणाव, कामाच्या ठिकाणचा वाढता तणाव, मुलांना वाढवण्यासाठीचा खर्च ही एक मुलावरच थांबण्यामागची प्रमूख कारणे असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. ‘मदर्स डे’ निमित्त देशभरातील महत्वाच्या १० शहरातून १५०० महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. असोचेमच्या सामाजिक विभागाने हा सर्व्हे केला. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लखनऊ आणि मुंबईतील महिलांना यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले होते. आपल्या मुलगा किंवा मुलीसाठी तुम्ही किती वेळ देता असा सवालही महिलांना विचारण्यात आला होता.

५०० हून अधिक महिलांना दुसरं मूल नकोय. दुसऱ्या बाळंतपणासाठी घेतलेल्या रजेमुळे आपल्या पदोन्नतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही जोखीम घेऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर काहींना एकाच मुलावर लक्ष केंद्रीत करता यावं म्हणून दुसरं मुल नकोय. काहींना त्यांच्या जोडीदाराकडून दुसऱ्या मुलाबाबत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

सरकारने एक मूल असलेल्यांना कर सवलत, भत्ते द्यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. अशा गोष्टींमुळे एक मूल संकल्पनेला प्रोत्साहन मिळू शकते, असे त्यांना वाटते.