वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी लावलेल्या दिशा दर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे. तर काही ठिकाणी दिशादर्शक फलक गायबच झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ये- जा करणाऱ्या प्रवाशांना माहिती मिळण्यास अडचण निर्माण होऊ लागली आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, गुजरात अशा भागांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे.  त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने या महामार्गावर वाहनांची वर्दळ असते.मागील काही वर्षांपासून या महामार्गावरून वाहतूक अधिकच वाढली आहे.

या राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात नागरिकांना प्रमुख ठिकाणांची माहिती मिळावी व कोणते ठिकाण किती किलोमीटर अंतरावर आहे याची माहिती व्हावी यासाठी दिशा दर्शक लफलक बसविण्यात आले आहेत. मात्र या दिशादर्शक फलकांच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे अनेक ठिकाणच्या भागात दिशादर्शक माहिती फलकांची दुरावस्था झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विशेषतः वर्सोवा पुलाच्या दिशेने मार्गावर तसेच पालघरच्या दिशेने जाणाऱ्या चिंचोटी, वसई फाटा, विरार फाटा यासह अन्य ठिकाणी फलक तुटलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे.तर काही ठिकाणाहून माहिती फलक गायब झाले आहेत असे प्रवाशांनी सांगितले आहे. दिशादर्शक फलकामुळे नागरिकांना ये जा करताना ठिकाणांची व्यवस्थित माहिती होते. मात्र तसे चित्र राष्ट्रीय महामार्गावर नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे नागरिक किरण पार्टे यांनी सांगितले आहे.

विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करतात अशा प्रवासी वर्गासाठी हे दिशादर्शक फलक फार महत्त्वाचे ठरतात त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे. अशा ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिशा दर्शक फलक लावावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुने दिशादर्शक फलक बदलून त्या ठिकाणी नवीन दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत.त्यासाठीची निविदा प्रक्रिया ही पार पाडली आहे. लवकरच राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक लावले जातील :- सुहास चिटणीस, व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण