वसई: वसई विरार मध्ये संरक्षित वन क्षेत्रात करण्यात येत असलेल्या अतिक्रमणांच्या विरोधात वनविभागाने कारवाई सुरू केली आहे. नुकताच बिलालपाडा, आचोळे व वालीव अशा तीन ठिकाणी मांडवी वनविभागाने कारवाई करीत सुमारे १६०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केले आहे.
वसई विरार शहराच्या पूर्वेच्या भागात मोठ्या प्रमाणात जंगल पट्टा आहे. यातील काही भाग तुंगारेश्वर अभयारण्यात येतो तर काही भाग संरक्षित वनक्षेत्रात मोडतो.
मागील काही वर्षापासून संरक्षित वन क्षेत्रात अतिक्रमण करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. या अतिक्रमण रोखण्यासाठी आता वन विभाग सज्ज झाला असून विविध ठिकाणी कारवाया सुरू केल्या आहेत. नुकताच नालासोपारा पूर्वेच्या बिलालपाडा येथील संरक्षित वन सर्व्हे क्रमांक ९४, आचोळे सर्व्हे क्रमांक २५१ शिर्डी नगर परिसर व वालीव सर्व्हे क्रमांक ७६ अशा तीन ठिकाणी वन विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.
या कारवाईत १ हजार ६०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करून वन क्षेत्र मोकळे करण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मांडवी रिता वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल यतिश तरे,प्रभाकर कुडाळकर, वनरक्षक पद्माकर केंद्रे संतोष पाटील, पंकज यादव , किशोर राजपूत, स्वाती दराडे संजय सांबर, विजय राऊत, संजय पागी व त्यांच्या पथकाने केली आहे.