भाईंदर:-दहिसर पथकर नाक्यावर वाहनांच्या वर्दळीमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजना अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, मार्ग पार करण्यासाठी मोठा वेळ वाया जात आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर पथकर नाक्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ सतत असते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने गेल्या वर्षी चारचाकी हलक्या वाहनांना पथकरातून सूट दिली होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याची आशा होती. मात्र, हा निर्णय अंमलात आल्यानंतरही कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही.
या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. पश्चिम उपनगरांमधून मुंबईत प्रवेश करण्यासाठी रेल्वे आणि हा महामार्ग हेच प्रमुख पर्याय असल्यामुळे खासगी व सार्वजनिक वाहतूक मुख्यत्वे याच मार्गावरून होते. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात न आल्यामुळे प्रवाशांना दररोज २० ते २५ मिनिटे वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. त्यातच मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून, किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
उपाययोजना ठरल्या अपयशी
फेब्रुवारी महिन्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर पथकर नाक्याची पाहणी करून वाहतूक कोंडीसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. यामध्ये अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करणे, दिशादर्शक फलक लावणे, तसेच रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते. याशिवाय, ठराविक वेळेत अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती. सुरुवातीला या उपायांमुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून आले होते. मात्र, त्यानंतर पुढील पाठपुरावा न झाल्यामुळे हे उपाय अंमलबजावणीअभावी निष्फळ ठरले आहेत. परिणामी प्रवाशांना अजूनही तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे, अशी तक्रार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे.