वसई : मागील काही वर्षांपासून वसई विरारच्या किनार पट्टीवर रिसॉर्ट संस्कृती फोफावू लागली आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. या वाढत्या पर्यटकांच्या गर्दीने व हुल्लडबाजीमुळे वसईच्या भागातील शांतता भंग होऊन येथील निवांत पणा हरवत चालला आहे. तर दुसरीकडे पर्यटकांची हुल्लडबाजी ही येथील नागरिकांच्या जीवावर बेतू लागल्याने एक प्रकारे चिंतेचा विषय बनला आहे.
रविवार हा सुट्टीचा, आरामाचा, निवांतपणे कुटुंबियांसमेवत घालविण्याचा..आठवड्याची दगदग, थकवा क्षीण घालविण्याचा हक्काचा दिवस. मात्र वसईच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थांचा हा निवांतपणा गेल्या काही वर्षापासून हरवला आहे. कारण ठरलंय ते येथील किनारपट्टीवर असलेले अमर्याद बेकायदेशीर रिसॉर्ट आणि त्यात हुल्लडबाजी करत येणारे पर्यटक. या रिसॉर्ट मध्ये जाणारे रस्ते गावागावाच्या गल्लीतून जातात. त्यामुळे पर्यटकांची हुल्लडबाजी, निमुळत्या रस्त्यांमुळे गावात होणारी वाहतूक कोंडी यामुळे वसईकर अक्षरश: त्रस्त झाले आहेत. सुट्टीच्या दिवशी घरातून बाहेर पडणं देखील कठीण होऊन बसले आहे.
मुंबईपासून जवळ असलेल्या वसई पश्चिमेच्या किनारपट्टीवर दोनशेहून अधिक लहान मोठी रिसॉर्टस आहेत. अर्नाळा, नवापूर, राजोडी, कळबं अशा परिसरात त्यांचा विस्तार झाला आहे. मागील काही वर्षांपासून त्यांची संख्या ही बेसुमार वाढली आहे.यातील बहुतांश रिसॉर्ट ही बेकायदेशीर असून नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेली आहेत. समोर समुद्र, निसर्गरम्य वाडी, तरणतलाव, विविध करमणुकीची साधने अशा या रिसॉर्टचं स्वरूप. मुंबई, ठाणे, भाईंदर, परिसरातील नागरिक एक दिवसांच्या मौजमजेसाठी या रिसॉर्टमध्ये येऊ लागले आहे. विशेषतः विकेंडला सर्वच रिसॉर्ट फ़ुल असतात. एक लाखाहून अधिक पर्यटक वसई विरार शहरात सुट्टीच्या दिवशी येत असतात. मात्र दिवसेंदिवस वाढत जाणारी पर्यटकांची गर्दी वसईकरांची शांतता, निवांतपणा भंग करणारी ठरू लागली आहे.
अनेक रिसॉर्ट मध्ये मद्यविक्रीचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना त्याठिकाणी सर्रासपणे मद्य उपलब्ध करून दिले जाते. या मद्यपाना नंतर काही अतिहौशी पर्यटक हुल्लडबाजी करतात. यामुळे मारामारी, अरेरावी, वादविवाद या सारखे प्रकार समोर येत असतात.तसेच काही पर्यटक रस्त्याने, गावाच्या गल्लीतून ये -जा करताना कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवत जाणे, भरधाव वेगाने वाहने चालविणे यामुळे रस्त्यावर अपघाताच्या घटना ही घडत आहेत.नुकताच राजोडी रस्त्यावर एका वृद्धाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. या पूर्वी सुद्धा पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दिवसेंदिवस ही हुल्लडबाजी अधिकच वाढत असल्याने ती सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे चित्र दिसून येत आहे.अशा पर्यटकांना रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना व कारवाया प्रशासनाकडून होत नसल्याने त्याचा मोठा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
यावसईतील रिसॉर्ट संस्कृतीच्या विरोधात वसईतील नागरिक लढा देत आहेत. सागरी नियंत्रण क्षेत्राची मर्यादा ५०० वरून ५० मीटर वर आणल्याने रिसॉर्ट फोफावू लागले आहेत.यामुळे येथील पर्यावरणाला तर धोका निर्माण झाला आहेच.याशिवाय गावातील नैतिकता ढासळली आहे.वसईच्या परिसराचा भौगोलिक दृष्टीने व तेथील अडचणींच्या संदर्भात कोणताच विचार होत नसल्याने अनेक समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.पर्यटन विकास महत्वाचा असला तरी त्यात नियोजनबद्धता असायला हवी आहे. वसईचा भौगोलिक क्षेत्राचा विचार करता एखाद्या भागात क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक आल्यास त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. त्यामुळे येथील नागरिकांना मोकळा श्वास घेणे ही कठीण झाले आहे.अशा प्रकारच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासन ही योग्य ती पावले उचलत नाहीत. जर यावर नियोजनात्मक उपाययोजना झाल्या नाहीत तर आगामी काळात अशी रिसॉर्ट संस्कृती गावातील गाव पण उध्वस्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गर्दीने वसईकरांची कोंडी
वसई विरार मध्ये समुद्र किनारी व रिसॉर्टच्या दिशेने जाणारे रस्ते हे अरुंद आहे. त्यातच आता पर्यटकांची गर्दी व सोबत आणलेल्या वाहनांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जटिल बनली आहे. विशेषतः राजोडी, भुईगाव रस्ता, आब्राहम नाका, उंबरगोठण ते नवापूर, नंदाखाल, वटार, दोन तलाव यासह गावातील छोट्या रस्त्यावरून जात असतात पर्यटकांच्या वाहनांमुळे गावातील निमुळत्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. अशा वेळी नागरिकांना घराच्या बाहेर पडणे देखील कठीण होऊन बसले आहे. सुट्टीच्या दिवशी तर रस्ते पूर्णतः ब्लॉक होतात. अशा कोंडीतून रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन परिस्थितीत वाहने देखील जाऊ शकत नाहीत इतकी अवस्था भयाण असते. विशेषतः या कोंडीमुळे येथील नागरिकांना गाडी घेऊन बाहेर पडणे तर सोडाच परंतु घरातून बाहेर निघता येत नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे ही बंद केले आहे.
नागरी सुरक्षेचे काय ?
पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही रिसॉर्ट मध्ये कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाही.त्यामुळे मागील काही वर्षात तरणतलावात बुडून मृत्यू पर्यटकांची संख्या ही वाढत आहे. बहुतांश रिसॉर्टमध्ये जीवरक्षक नसतात. तर काही रिसॉर्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक घेतले जातात अशा वेळी प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवणे अवघड त्यामुळे ही पर्यटक बुडण्याच्या घटना घडत असतात. तर दुसरीकडे गावातील गल्लोगल्ली असलेल्या रस्त्यावरून सुसाट वाहने चालविली जातात. काही जण स्टंट बाजी करत जातात. यावेळी अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरी सुरक्षेचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.