मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराच्या नागरीकरणा सोबतच औद्योगिक क्षेत्र ही विस्तारले आहे. ३० हजारांच्या जवळपास उद्योग व त्यातून लाखो नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शहराची उद्योग नगरी अशी ओळख निर्माण झाली आहे. मात्र हे उद्योग जिवंत ठेवण्यासाठी मुख्यतः आवश्यक असलेली वीज योग्य रित्या उपलब्ध होत नसल्याने येथील उद्योग संकटात सापडू लागले आहे आहे.

वसईच्या भागात सत्तरच्या दशकात वसई पारनाका येथे राहणारे दिवेकर व त्यांचे मुंबईचे मित्र चव्हाण यांनी महाराष्ट्र शासनाकडून गावराईपाडा येथे जागा मिळविली. व त्यानंतर त्या जागेत प्लॉट तयार करून वसई तालुका कॉपरेटिव्ह इंडस्ट्रियल या सहकाराच्या माध्यमातून ती उद्योगांना देण्यात आली. त्यावर शेड उभारून वसईच्या औद्योगिक पर्वाला सुरुवात झाली. त्यावेळी भांड्याचे कारखाने, स्टील भांड्यांचे रॉड,  सॉलिड वेस्ट यंत्र व त्याचे विशिष्ट भाग तयार करणारे कारखाने उभारण्यात आले होते.

त्यानंतर हळूहळू या उद्योगांनी आपली वाटचाल सुरूच ठेवली. उद्योगांची होत असलेली प्रगती लक्षात घेता. त्यावेळी शासनाने एमआयडीसी तयार होण्यासाठी ऑफर दिली होती. मात्र पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध न झाल्याने एमआयडीसीने नकार दिला. त्यामुळे वसई एमआयडीसी होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. मात्र तेवढ्यावरच न थांबता येथील उद्योगांनी भरारी घेत आपले उद्योग धंदे सुरू ठेवले. त्यानंतर “औद्योगिक क्षेत्र” ( इंडस्ट्रीयल झोन) घोषित झाल्याने पुन्हा एकदा उद्योगांना चांगली बळकटी मिळाली.

मुंबई महानगरीला लागून असलेले वसई विरार शहर व दळणवळणाच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग सर्व भागांना जोडणारे सोपस्कर मार्ग यामुळे उद्योग स्थिरावत गेले.

मागील काही वर्षात वसई विरारचे औद्योगिक क्षेत्र हे झपाट्याने विस्तारले आहे.विशेषतः गोलानी, रेंज ऑफिस, गावराईपाडा, नवघर, वालीव, पेल्हार,कामण, चिंचोटी, पोमण, सागपाडा, वसई फाटा, नालासोपारा फाटा, विरार फाटा, मालजीपाडा, बापाणे, कोपर फाटा, खानिवडे, पारोळ या भागात जवळपास ३० हजाराहून अधिक लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग कारखाने उभे राहिले आहेत.या कारखान्यांमुळे येथील जवळपास पाच ते सहा लाख नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

प्रामुख्याने कुशल कामगारांच्या सोबत अकुशल कामगारांना या ठिकाणी यात काम करण्याची संधी मिळाली आहे.  त्यामुळे एकप्रकारे येथील अर्थकारणाला मोठी गती मिळाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला ही याच उद्योगामुळे चांगले काम मिळाले आहे.

औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे तेथील पायाभूत सुविधा असणे, मात्र त्यांचीच मोठी कमतरता या उद्योगांना भासत असल्याचा सूर आता उद्योजकांमधून उमटू लागला आहे.सर्वाधिक गरज आहे ती म्हणून विजेची परंतु मागील तीन ते चार वर्षांपासून वीज समस्येने उद्योजक अक्षरशः त्रस्त झाले आहे. शहराला होणाऱ्या वीज पुरवठ्या पैकी उद्योगांना जवळपास ७० टक्के अर्थात ५४० मेगा वॅट इतकी वीज लागते. सर्वाधिक महसूल ही वीजदेयकांच्या स्वरूपात याच उद्योग नगरी मधून मिळतो.

असे असताना वीज ही हव्या त्या प्रमाणात मिळत नाही. सतत वीज पुरवठा खंडित होण्याचे सुरूच राहिल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याचे उद्योजक सांगत आहे. याबाबत अनेक उद्योजकांच्या संघटना व प्रतिनिधी वारंवार वीज व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करीत मात्र त्या पाठपुराव्याला फारशी शासनस्तरावरून दाद दिली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हे संकट अधिकच गडद बनू लागले आहे.

भविष्यात उद्योगांची वाटचाल अधिक चांगली व्हावी व वसईतील उद्योग टिकावे यासाठी सर्वप्रथम विजेची समस्या सोडविणे आवश्यक आहे. जर नागरिकांना व उद्योगांसाठी वीज वितरणाचे जाळे तयार केले तर त्याचा उद्योगांना फायदा होईल. व स्थानिक स्वराज्य संस्थेने ही रस्ते, पाणी व उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक सुविधा दिल्या तर वसईतील औद्योगिक क्षेत्राला चालना मिळून नागरिकांना ही रोजगार मिळेल.

उद्योग स्थलांतरणाच्या मार्गावर

सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. वीज गेल्यानंतर काही उद्योजक जनरेटर वर उद्योग सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत यासाठी लाखो रुपयांचे इंधन खर्च करावा लागतो. परंतु काही कारखाने असे आहेत की ते विजे शिवाय चालवू शकत नाही.

या वीज समस्येमुळे उद्योजकांना अन्य ठिकाणी स्थलांतर होण्याची वेळ आली आहे. वीज समस्येला कंटाळून नुकताच कामण येथील पॅकिंग मटेरील, प्लास्टिक, सॅनिटायझर तयार करणाऱ्या तीन कारखाने वापी गुजरात येथे स्थलांतरित झाले. तर दुसरीकडे अन्य उद्योग वर्गातून स्थलांतरणाचा सूर उमटू लागला आहे. तर असेच चित्र सुरू राहिले तर येथील उद्योग हे हळूहळू अन्य राज्यात स्थलांतरीत होतील. याचा मोठा फटका येथील गोरगरीब मजूर वर्गाला बसेल. यासाठी प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष केंद्रित करून औद्योगिक क्षेत्र सावरण्याची वेळ आली आहे.

पायाभूत सुविधांवर भर हवा

एकीकडे वीज तर दुसरीकडे पायाभूत सोयीसुविधांचा अभाव ही औद्योगिक क्षेत्रात दिसून येत आहे. महापालिकेकडे मालमत्ता कराच्या स्वरूपात औद्योगिक वसाहतीतून कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर जातो. मात्र येथील अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था याशिवाय अन्य सोयीसुविधा अजूनही योग्य रित्या मिळत नसल्याच्या तक्रारी उद्योजक करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेषतः अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी स्थिती असते. पावसाळ्यात तर या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने त्यातून वाट काढताना अवजड वाहन चालकांना ही चांगलीच कसरत करावी लागते असे चित्र दिसून येते तर काही वेळा चिखलाचे साम्राज्य तयार होते. अशातून मालवाहतूकदार, कामासाठी कारखान्यात येणारा कामगार वर्ग यांना वाट काढावी लागते. यासाठी जो विभाग शहराच्या विकासात हातभार लावतो अशा कडे दुर्लक्ष न करता तेथील समस्या गांभीर्याने समजून घेणे आवश्यक बनले आहे