वसई: सोमवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले.या समस्येकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले असल्याने याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर पावसाळ्यात पावसाचे पडणारे पाणी वाहून जावे यासाठी नैसर्गिक नाले होते. मात्र मागील चार ते पाच वर्षांपासून पाणी जाण्याचे  अनेक मार्ग बंद झाले आहेत.

याशिवाय महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणात माती भराव झाल्यामुळे पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.

पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्राधिकरणाने कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.

मागील दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे महामार्गावरील मालजीपाडा, किनारा हॉटेल, ससूनवघर जवळील जेके टायर समोर, वसई फाटा, सन शाईन हॉटेल समोर, नालासोपारा फाटा,यासह विविध ठिकाणच्या भागात पाणी तुंबून राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहने पुढे सरकताना ही अगदी धीम्या गतीने सरकत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. विशेषतः मुंबई, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर व वसई विरार कडे येणाऱ्या वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले.