कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना खासदार उदयनराजे वर्ज्य नाहीत. साताऱ्यात आले की ते उदयनराजेंना भेटतात. त्यांच्याशी चर्चा-संवाद  साधने. राज्यातील राजकारण त्रास देणाऱ्यांच्या तक्रारी असा कार्यक्रम असतोच. खासदार उदयनराजेही येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करतात, त्यांचे ऐकून घेतात, कधीतरीच तिखट प्रतिक्रिया देतात. आज सोमवारी आमदार सत्यजित तांबे साताऱ्याला आले होते. त्यांनीही सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजे यांनी तांबे यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केले. स्वागत करत असताना त्यांनी पुष्पगुच्छ दिला आणि शाल देताना खा.उदयनराजे यांनी आ.सत्यजित तांबे यांच्या गळय़ाला शालीचा फास लावला. बघा तुम्हाला फास लावलाय आम्ही लावला नाही पण तुम्हाला असा फास लावला जातोय बघा, अशी मिश्किली केली. त्यावर सत्यजित तांबेनीही त्याला दाद दिली.

बडवेच अधिक

विधिमंडळाचे अधिवेशन होत असतानाच मुलांच्या वार्षिक परीक्षांचा हंगामही संपत आलेला असतो. अशा वेळी प्रशासकीय पातळीवर अधिकारी वर्गाला बदलीचे वेध लागलेले असतात. नोकरीत रुजू होत असतानाच प्रशासकीय सोयीनुसार ज्या ज्या ठिकाणी नियुक्ती होईल तिथे कायद्यानुसार शासकीय काम करण्याची मन:स्थिती दर्शवली असताना मिळकतीच्या ठिकाणीच बदली हवी यासाठी नाना कारणे घेऊन अधिकारी मंडळी राजकीय नेत्यांकडे  हेलपाटे मारत असतात. हा सार्वत्रिक अनुभव आहे. दरवेळी अशीच स्थिती असली तरी हव्या त्या ठिकाणी नियुक्ती मिळावी यासाठी राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवत असताना नैवेद्य अर्पण करावाच लागतो. आधुनिक लोकशाहीत हा शिष्टाचार आहे. मात्र, मंत्रीमहोदयांची भेट घेऊन काम सांगितले  की, खासगी सचिवांची भेट घेण्यास सांगितले जाते. खासगी सचिवांची भेट घेउन खडीसाखर दिली तर नैवेद्याचे ताट कोणाला द्यायचे असा प्रश्न पडला असून मालकी सांगणारे बडवे चार असल्याने हा पेच  लवकर सुटू दे रे महाराजा अशी आर्जवे करण्याची वेळ आली आहे.

BJP needs support from MNS A look at Raj Thackeray stance on participation in the Grand Alliance
भाजपला मनसेची साथ हवी ; महायुतीतील सहभागाबद्दल राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”

निंबाळकर-मोहिते संघर्ष ?

एकेकाळी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा गड समजले गेलेल्या सोलापूर जिल्ह्यात २०१४ पासून राजकीय समीकरणे बदलली आणि भाजपने संपूर्ण जिल्ह्यावर पकड निर्माण केली खरी; परंतु संघाची करडी नजर असूनही भाजपची प्रतिमा इतरांहूनी वेगळा अशी दिसत नाही. विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्यातील सततच्या भांडणामुळे दोघांनाही यापूर्वीच मंत्रिपद गमवावे लागले आहे. आमदार विजय देशमुख हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशीही फटकून वागतात. हे सर्वज्ञात असताना पक्षातील गटबाजी, संघर्षांचे लोण माढा लोकसभा मतदारसंघातही कधी पोहोचले हे कळलेही नाही. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी ताकद पणाला लावून माढा लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून आणले. परंतु अलीकडे खासदार निंबाळकर व मोहिते-पाटील यांच्यात खूपच बिनसल्याचे दिसत असून दोघांच्या वाटा वेगवेगळय़ा झाल्याचे दिसून येते. मोहिते-पाटील विरोधक मानले जाणारे सांगोल्याचे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्याशी खासदार निंबाळकरांची मैत्री वाढली आहे. शहाजीबापू पाटील यांनी खासदार निंबाळकरांच्या साक्षीने मोहिते-पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. निंबाळकरांना पर्याय म्हणून स्वत: मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. अर्थातच भाजप श्रेष्ठींचे प्रगतिपुस्तक तेवढेच महत्त्वाचे आहे. एवढे मात्र खरे की, निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष लवकरच चव्हाटय़ावर येणार हे तितकेच खरे.

फूल आणि काटे

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात दीर्घकाळ वावर असलेले आणि देवस्थान व्यवस्थापन समितीचा कारभार पाहिलेले जेष्ठ नेते निर्वतले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. उपलब्ध चांगला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दिवंगत नेत्याची सय काढताना एका मित्राने त्यांच्या नाव आणि आडनावाचा संदर्भ त्यांच्या थोरवीचे कथन केले. बोलण्याच्या ओघात त्यांनी नावाचा उल्लेख करून  ते गुलाब असले तरी त्याखालचे काटे कधी कोणाला बोलले नाहीतह्ण  असे त्यांची महत्ता विशद करून प्रतिमेला गुलाब पुष्प वाहिले असते, तर अधिक सयुक्त ठरले असते; उल्लेख केला. झाले! मागील संयोजन यंत्रणा हलली. कोणाच्या ध्यानात येणार नाही अशा सावधगिरीने धावपळ करून गुलाबाच्या पाकळय़ा मागवण्यात आल्या. त्या प्रतिमेसमोर पसरल्या. आधीचा पुष्पहार बदलला. नव्याने मागवलेला गुलाबांचा पुष्पहार प्रतिमेवर चढवण्यात आला. पुन्हा एकदा हात जोडले. आणि अशा कार्यक्रमातही भावनेला कर्तव्याची जोड मिळाली.

मराठी भाषेचा विकास

सरकारी काम म्हणजे त्याचा एक जटिल खाक्या ठरलेला असतो. त्याच्या पल्याड  जाऊन काही सुलभ ,सुगम करावे हे जणू प्रशासनाच्या गावीच नसावे. लोकांना माहिती पाठवली की झाले अशी रीत पडलेली. मराठी भाषा मंत्री असलेले दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री. त्यांच्या जिल्ह्यातील मराठी भाषेचा एक नमुना नुकताच पाहायला मिळाला. श्रीक्षेत्र जोतिबा उत्कर्ष प्राधिकरणबाबत एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. त्याची प्रसिद्धी करताना  आयडिया कॉम्पिटिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन फॉर प्रोव्हायिडग इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज इन अ‍ॅण्ड अराऊंड जोतिबा (वाडी रत्नागिरी) हिल फॉर पिलग्रीम्स विसीटिंग जोतिबा अ‍ॅज वेल अ‍ॅज इन द एरिया ऑफ जोतिबा प्राधिकरण, ता. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर  अशी वाक्यरचना करण्यात आली. त्याची निविदा शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचाही त्यामध्ये उल्लेख आहे आहे. कोणी कुतूहलापोटी संकेतस्थळावर डोकावले तर तेथील क्लिष्टता पाहून का इकडे आलो असे वाटण्यासारखी गुंतागुंत. लोकाभिमुख प्रशासन ,कारभार म्हणायचे आणि जडबंबाळ भाषेतील अगम्य पद्धती ठेवायची, असा हा तद्दन सरकारी खाक्या. त्याला केसरकर पालकत्व निभावत असलेला कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी भाषेचा विकास  कसा बरे अपवाद ठरावा.

(संकलन : विश्वास पवार, दिगंबर शिंदे, एजाज हुसेन मुजावर, दयानंद लिपारे)