यंदाच्या खरीप हंगामाला एव्हाना गती आली आहे. शिवारातील लगबग वाढली आहे. मे महिन्यात उन्हाची तीव्रता भलतीच वाढलेली असते. अंगाची लाही लाही होत असते, पण या वर्षी याच महिन्यात राज्यात सर्वदूर बक्कळ पाऊस झाला. जूनच्या मध्यास पावसाने जोर पकडला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २०२५-२६ च्या खरीप हंगामात देशात अन्नधान्य उत्पादनात एक नवीन विक्रम गाठण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. २०२४-२५ च्या खरीप हंगामात भारताचे अन्नधान्य उत्पादन विक्रमी १६८.०६ दशलक्ष टनांवर पोहोचले. २०१४-१५ पासून खरीप अन्नधान्याचे उत्पादन ३१.२३ टक्क्यांनी वाढले आहे. ही आकडेवारी उत्साह वाढवणारी असताना शेतकऱ्यांनी खरिपाच्या तयारीला हात घातला आहे.
महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम २०२५-२६साठी पेरा १५६ लाख हेक्टरच्या पुढे नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. कृषी विभागाने पेरणीसाठी बियाणे आणि खतांचा पुरवठा पुरेसा असून, काटेकोर नियोजन सुरू केल्याचे म्हटले आहे. मे महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याने पेरणीपूर्व मशागतीवर काही एक प्रमाणात परिणाम जाणवत असला, तरी शेतकऱ्यांकडून खरिपाच्या आशा चांगल्याच पल्लवित झालेल्या आहेत. कुटुंबकबिल्यासह शेतकरी शेतात घाम गाळत आहे. काट्याकुट्या वेचणे, शेणखत पसरणे, जमीन भुसभुशीत करणे, बांधाची डागडुजी अशी पूर्वमशागतीची कामे झपाट्याने करण्यावर भर आहे.
धूळवाफ्यातील पेरा वाढला आहे. त्याची उगवण जोमदार झाली आहे. खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. कृषी विभागाने राज्यातील पेरक्षेत्र विचारात घेऊन सर्व प्रकारच्या बियाण्यांची पुरेशी उपलब्धता केली आहे. शासकीय आणि खासगी व्यवस्थापनाची मदत घेण्यात आली आहे. खते, बियाणे निविष्ठा केंद्रासह निविष्ठा बाजारपेठ नव्या हंगामासाठी सज्ज झाली आहे. मे महिन्यामध्येच सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
जमिनीच्या मशागतीला अनन्यसाधारण महत्त्व असते; पण या वर्षी अवकाळी पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला शेतकऱ्यांना फारसा वाव मिळालेला नाही. परिणामी, यंदा पेरणीपूर्व पुरेशा मशागती होण्याऐवजी आहे त्या परिस्थितीत शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे यंदा प्रतिवर्षापेक्षा लवकर पेरण्या होतील, असा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. राज्याच्या काही भागांमध्ये धूळवाफ्यातील पेरण्या केल्या जातात. विशेषत: भात व इतर काही कडधान्यांची पेरणी ही धूळवाफ पद्धतीने केली जाते. साधारणपणे मे महिन्याच्या मध्याला या पेरण्या केल्या जातात. यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाचा जोर राहिला आहे. त्यामुळे अनेक भागांत धूळवाफ्यातील पेरण्या झाल्या नाहीत. तर, काही ठिकाणी धूळवाफ पेरण्या अगदी वेळेवर झाल्या आहेत. त्या ठिकाणची पिके आता तरारून उगवली आहेत.
विशेषत: नदीकाठच्या काही भागात उन्हाळी सोयाबीनची लागवड केली जाते. उसासाठी फेरपालटाचे पीक म्हणून शेतकरी मे महिन्यातच सोयाबीन, उडीद, मूग, उन्हाळी भुईमूग अशी पिके घेतात. त्याच्याकडे पाण्याची शाश्वत सोय असते. त्यामुळे शेतकरी उन्हाळी पिके घेऊन पुढे जुलैमध्ये उसाची लागण करतात. अशी रानातील सोयाबीन, उडीद व इतर पिके आता फुलोऱ्यावर आलेली आहेत. शेतकरी त्यामध्ये भांगलणी, कोळपणी कामे जोमाने करताना दिसाताहेत. तसेच अनेक ठिकाणी पावसाने रानामध्ये पाणी साठले आहे. परिणामी, आंतरमशागतीची कामे खोळंबलेली आहेत. पूर्वमशागतीकरिता शेतकरी रोटाव्हेटरचा वापर करू लागला आहे. रोटाव्हेटरचा वापर प्राथमिक आणि दुय्यम मशागतीच्या क्रियाकलापांमध्ये केला जाऊ शकतो. हे प्रामुख्याने माती कापण्यासाठी आणि बियाणे तयार करण्यासाठी वापरले जाते. जमीन खोल नसेल आणि हलकी असेल, तर रोटाव्हेटरचा वापर करावा; पण सरसकट रोटाव्हेटरचा वापर केल्याने मशागतीनंतर जमीन दिसायला चांगली दिसते; प्रत्यक्षात पेरणीनंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.
कृषी विभाग शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सज्ज झाला आहे. आत्माअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध करून दिली आहेत. जमीन सुधारणेची कामे, ज्यामुळे मातीचा सेंद्रिय कर्ब वाढेल, जमीन भुसभुशीत होईल अशी कामे करावीत. पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी, माती परीक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. एका साध्या चाचणीमुळे तुमच्या मातीचे पोषक तत्त्वांचे प्रमाण आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण दिसून येते. या निकालांच्या आधारे, शेतकरी माती संतुलित करण्यासाठी आणि त्यातील पोषक तत्त्वे वाढविण्यासाठी योग्य खते किंवा सेंद्रिय घटक निवडू शकतात. आपापल्या प्रदेशाचे हवामान, मातीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता यावर आधारित योग्य पीक निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जास्त पावसाच्या प्रदेशासाठी भात हे आदर्श पीक आहे, तर शेंगदाणे आणि कापूस हे कोरड्या प्रदेशांसाठी अधिक योग्य असू शकतात. उच्च उत्पादन देणारी, कीटक-प्रतिरोधक आणि दुष्काळ सहन करणारी जात निवडणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
चांगली तयार केलेली शेती मुळांच्या निरोगी विकासाला प्रोत्साहन देते आणि रोग आणि पाण्याच्या ताणाविरुद्ध पिकाची प्रतिकारशक्ती वाढवते. शेत स्वच्छ करत असतानाच गोळा होणारा काडीकचरा कंपोस्ट खड्ड्यात साठवावा. त्याचे चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होईल. यामुळे खतावरील खर्च तर वाचेलच, पण जमिनीचे आरोग्यही सुधारेल. माती परीक्षण करण्याकरिता हा काळ अतिशय योग्य असा आहे. माती परीक्षणामुळे कोणती पिके करायची याचा निर्णय घेता येईल. चुनखड जमीन, क्षारयुक्त चोपण जमीन, अति खोल जमीन, हलकी जमीन, असे वेगवेगळे प्रकार आहेत. क्षारयुक्त जमिनीत कापूस, घास, कांदा किंवा आडसाली ऊस घेतला पाहिजे. माती परीक्षण केल्याने जमिनीचा सामू कसा आहे, हे समजते.
शेतीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी येतात त्या रोपवाटिकांचा हंगामही जोमात सुरू झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये गावोगावी भाजीपाला, ऊस, फळे, केळी पिकांच्या रोपवाटिका, नर्सरी, हार्डनिंग सेंटर सुरू झालेली आहेत. सध्या या रोपवाटिकांमधून गर्दी होऊ लागलेली आहे. अनेक पिकांच्या तयार तरवा मिळविण्यासाठी सध्या या नर्सरींवर शेतकऱ्यांची झुंबड उडालेली आहे. कमी कालावधीच्या वांगी, मिरची, फुलपिकांच्या तरवासाठी शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे. प्रत्येक शेतकरी कमी-अधिक प्रमाणामध्ये या पिकांची लागण करत असतो. सध्या सगळीकडे तयार तरवांचा वापर करण्यासाठी कल वाढलेला आहे. वाफ्यातील रोपे, ट्रेमधील रोपे आणि बंदिस्त वातावरणातील निरोगी रोपे, तरवे खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.
पाऊस चांगला झाला आहे. पुढेही तो दमदार होण्याची शक्यता वर्तवली आहे. चांगल्या निविष्ठा उपलब्ध झाल्याने पिकांची वाढ जोमदार होईल अशी आशा आहे. पण, लहरी हवामानाचा फटका बसणार नाही, यासाठी दक्ष असावे लागेल. हवामान बदलामुळे उन्हाळ्याचा पावसाळा नि पावसाळ्याचा उन्हाळा होऊ लागला आहे. पिकांना कडक ऊन सोसवेनासे होते. अचानक थंडी गायब होते. परिणामी, थंडीत येणाऱ्या पिकांचे आरोग्य बिघडते आहे. ज्या पिकांना कडक उन्हाची गरज असते, ती बदलत्या हवामानात कोमेजून जातात. सगळे ऋतुचक्र विस्कळीत झालेले आहे. शेतीच्या पीक पॅटर्नवर त्याचा गंभीर असा परिणाम होतो आहे. यामुळे शेती फायद्यात येण्याऐवजी दिवसेंदिवस तोट्यात निघालेली आहे. याचाही सारासार विचार नि काहीएक नियोजन खरिपाला सामोरे जाताना गाठीशी असायला हवे.
dayanandlipare@gmail.com