मुंबई विद्यापीठाचे कल्याण शहरातील उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी करण्यात आले. अद्याप हे उपकेंद्र सुरू करण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रशासनाने पुढाकार घेतलेला नाही. हे उपकेंद्र सुरू करण्यास विलंब करून या भागातील विद्यार्थ्यांचा अंत पाहिला जात आहे. त्यामुळे हे उपकेंद्र तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी मनसे विद्यार्थी संघटनेतर्फे मंगळवारपासून कल्याणमधील शिवाजी चौकात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.
कल्याण उपकेंद्र सुरू करण्यासाठी मनसे विद्यार्थी संघटनेतर्फे राज्यपालांना पत्र देण्यात आले होते. त्याचीही दखल घेण्यात आलेली नाही. हे उपकेंद्र सुरु झाले तर कल्याणसह शहापूर, मुरबाड, भिवंडी, डोंबिवली, वाडा परिसरातील विद्यार्थ्यांना या उपकेंद्राचा लाभ घेता येणार आहे. या केंद्रासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने जागा उपलब्ध करून दिली आहे. काही निधी उपलब्ध करून दिला आहे. अत्यावश्यक सर्व बाबी पूर्ण केल्या असताना मुंबई विद्यापीठ प्रशासन हे उपकेंद्र सुरू करण्यात चालढकलपणा करीत आहे. या ठिकाणी क्रमिक अभ्यासाबरोबर रोजगारभिमुख अभ्यासाचे विभागही उघडण्यात येणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षणममंत्री राजेश टोपे यांनीच या उपकेंद्राचे भूमिपूजन केले होते. असे असतानाही प्रत्यक्ष कामास वेगाने सुरुवात होत नसल्यामुळे कल्याण, डोंबिवली परिसरातील विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.