महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षांचे (बारावी) निकाल बुधवारी (२८ नोव्हेंबर) दुपारी एक वाजता जाहीर होणार असून www.msbshse.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
 या वर्षी राज्यभरातून दहावीच्या परीक्षेसाठी २ लाख २३ हजार ३७६ विद्यार्थी बसले होते. एकूण ५७६ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातून १ लाख ८९ हजार १३४ विद्यार्थी बसले होते. एकूण ३२६ केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेचे निकाल बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर गुणपत्रक पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना सोमवारी (३ डिसेंबर) दुपारी तीन वाजता गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. गुणांच्या पडताळणीसाठी मंगळवार (४ डिसेंबर) ते गुरुवार (१३ डिसेंबर) या कालावधीमध्ये अर्ज करायचा आहे. निकालासंबंधी काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी (०२०) ६५२९२३१६ अथवा ६५२९२३१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.