जिल्ह्य़ात नोव्हेंबरपासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. जानेवारीमध्ये जिल्ह्य़ातील किमान तीनशे गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येणार आहे.
दर उन्हाळ्यात पाणीटंचाई पाचवीला पुजलेली असते. मात्र, या वर्षी टंचाईची तीव्रता अतिशय भीषण आहे. महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार टंचाईग्रस्त गावांच्या नोंदी अद्यापि झालेल्या नाहीत. तरी लातूर तालुक्यातील सुमारे ४० गावांना तर औसा तालुक्यातील सुमारे ५० गावांना पाण्याच्या तीव्र टंचाईस सामोरे जावे लागणार आहे. प्रशासनाने जानेवारीनंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावांसाठी उपाययोजना करण्याची तयारी सुरू केली आहे. विंधनविहिरी दुरुस्ती, अधिग्रहण, नळांची दुरुस्ती असे पारंपरिक उपायच योजले जात आहेत. पाण्याचा स्रोत सापडत नसल्यामुळे ठोस उपाययोजना करता येत नाही, हे वास्तव आहे.
लातूर शहराला धनेगाव धरणातून बंद पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. धनेगाव धरणातच पाणी नसल्यामुळे आठवडय़ातून दोन वेळा शहरवासीयांना पाणी मिळते आहे. मसलगा व नागझरी जलाशयातील पाणी लातूरकरांसाठी आरक्षित करण्याचे प्रस्तावित आहे. धनेगाव ते लातूर शहर या मार्गवर तांदुळजा, गाधवड, जवळा, निळकंठ, भोसा, पिंपळगाव (आंबा) आदी पंधरा गावे येतात. या प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. त्यामुळे लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून सध्या पाणी घेतले जाते आहे. उन्हाळ्यात शहरात पाणी पोहचेपर्यंत वाटेतच पंधरा गावांतील मंडळी पाण्याची वाटमारी करणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे लातूर शहराला पाणी कसे पुरवायचे, ही मोठी समस्या आहे.
लातूर तालुक्यातील काही गावात वार्षिक सरासरीच्या ७५ टक्केच पाऊस झाला आहे. या गावांनी गेल्या चाळीस वर्षांत पाण्याची टंचाई अशी अनुभवली नव्हती. पाण्याचा एवढा सुकाळ की शेतातील कूपनलिकांना विद्युतपंप न लावताही पाणी बाहेर निघायचे. अलीकडे पाण्याचा अतिवापर करण्याची सवय लोकांना लागली.पण या वर्षीच्या पाणी टंचाईने लोकही चांगलेच हादरले आहेत. १९७२ च्या दुष्काळात पाणी काही प्रमाणात उपलब्ध होते. मुख्य टंचाई होती ती अन्नधान्याची. या वर्षीची परिस्थिती उलटी आहे. अन्नधान्याची अडचण नाही, मात्र पाण्याची उपलब्धताच होत नाही. लातूर तालुक्यातील मुरूड, मुरूड अकोला, बोरगाव काळे, शिराळा, भिसे वाघोली, टाकळगाव, सारसा, आदी गावांना पाणीटंचाईने जर्जर केले आहे. येथे दररोज किमान दोन विंधनविहिरी घेतल्या जात आहेत. जमिनीत पाणीच उपलब्ध नसल्यामुळे ७०० ते ८०० फूट खोल जाऊनही आतून फक्त धुरळाच बाहेर पडतो आहे.
उसाची शेती केल्यामुळे आर्थिक संपन्नता आली. मात्र पाणी वापराचे शहाणपण गेले. पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात दरवर्षीच दीडपट पाणीउपसा झाल्यामुळे गेल्या तीनशे वर्षांतील पाण्याचा साठा संपला आहे, त्यामुळे या वर्षी उन्हाळ्यात अनेक गावांतील मंडळींना पाण्यासाठी स्थलांतर करण्याला पर्याय नाही. मात्र हे स्थलांतर करायचे कुठे या प्रश्नाने लोक आतापासूनच चिंतित आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2012 रोजी प्रकाशित
लातूर जिल्हय़ात तीनशे गावांना बसणार झळ
जिल्ह्य़ात नोव्हेंबरपासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. जानेवारीमध्ये जिल्ह्य़ातील किमान तीनशे गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येणार आहे.
First published on: 29-11-2012 at 01:22 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 300 village will be affected in latur distrect