केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे नऊ महिन्यांचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी कामगार संघटनेने कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घोषणा देत सुमारे तासभर ठिय्या मारला. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कारखान्याच्या कार्यस्थळावर असलेली लेव्हीची १५ हजार पोती साखर उचलल्यानंतर, आपण सरकारकडे परवानगी मागू, त्यानंतर उर्वरित ९ हजार पोती साखर विकून किंवा विकण्यास परवानगी देऊन वेतनाची थकीत रक्कम दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचे संघटनेचे सरचिटणीस पी. के. केदार यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे लेखी निवेदनही देण्यात आले. ढाकणे, शिवसेनेचे अनिल कराळे यांच्यासह सुमारे ५० ते ६० कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.
खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने ५ वर्षांचा लेखी करार करूनही केदारेश्वर कारखाना केवळ दोनच हंगाम चालवला. राज्य बँकेने पुन्हा २०१२-१३ या हंगामात परवानगी देऊनही चालवला नाही. वैद्यनाथने आश्वासन दिल्याप्रमाणे केदारेश्वरचे कामगार मे २०१२ ते जानेवारी २०१३ दरम्यान दैनंदिन काम करत होते, या ९ महिन्यांच्या वेतनाचे व त्याच्या भविष्यनिर्वाह निधीचे १ कोटी ५९ लाख रु. कामगारांना येणे आहे, ही रक्कम वैद्यनाथ कारखान्याने बेकायदा अडवून ठेवल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
याच मागणीसाठी केदारेश्वरचे संस्थापक अध्यक्ष, माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांनी कामगारांसहित काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. राजकीय दबावापोटीच वैद्यनाथ कारखान्याविरुद्ध साखर आयुक्त कारवाई करत नसल्याचा संघटनेचा आरोप आहे.