स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मानवत येथे रविवारी (दि. २७) रात्री ८ वाजता दुष्काळ परिषद आयोजित केली आहे. खासदार शेट्टी या दौऱ्यात लोअर दुधना प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणार आहेत.
‘सामना दुष्काळाचा व पंचनामा जलसिंचनाचा’ अभियानाची सुरुवात खासदार शेट्टी शनिवारी गेवराई येथे पहिली दुष्काळ परिषद घेऊन करतील. रविवारी मानवत व सोमवारी लोअर दुधना प्रकल्पाच्या कामाची पाहणी करून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या शेट्टी जाणून घेणार आहेत. परतूर येथेही शेट्टी यांच्या उपस्थितीत दुष्काळी परिषद होणार आहे.
मराठवाडय़ातील सर्व जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करावे, पुढील वर्षी खरीप व रब्बीसाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, जनावरांच्या चाऱ्यासाठी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, शेतकऱ्यांच्या पाल्यांकडून कुठल्याही प्रकारे शैक्षणिक शुल्क घेऊ नये, असे ठराव परिषदेत घेतले जाणार आहेत. मराठवाडय़ातील शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडाप्रमुख सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष माणिक कदम, अ‍ॅड. बोराळकर, प्रल्हाद इंगोले, राजेंद्र मोरे, अ‍ॅड. रामराव नाटकर, रवींद्र इंगळे, किशन सोमठणकर या जिल्हाध्यक्षांनी केले आहे.