राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत नागरिकांना १०८ या टोल फ्री क्रमांकावर मोफत आपत्कालीन वैद्यकीय सेवा राज्य सरकार लवकरच उपलब्ध करणार आहे. त्याच्या प्रशिक्षणासाठी नगर जिल्हय़ातील १०० डॉक्टरांची निवड झाली आहे. अठरा दिवसांच्या या प्रशिक्षणाची सुरुवात नगरमध्ये नुकतीच जिल्हा सरकारी रुग्णालयात करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाविषयी माहिती देताना महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्‍‌र्हिसेसचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. समीर सय्यद यांनी सांगितले, की केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांच्या मदतीने (पी.पी.पी.) हा उपक्रम राबवला जाणार आहे. राज्यभरात तो बी.व्ही.जी. इंडिया लि. (पुणे) व इंग्लंडमधील यूकेएसएस (लंडन) या कंपनीला संयुक्तरीत्या तो चालवण्यास दिला गेला आहे.
या उपक्रमांतर्गत कोणत्याही नागरिकांनी १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास २० ते ३० मिनिटांत वैद्यकीय, पोलीस, अग्निशमन या यंत्रणांची मदत मिळणार आहे. या कार्यक्रमात अत्याधुनिक आयसीयूची सुविधा असणाऱ्या कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. अ‍ॅडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट असणाऱ्या २३३ व बेसिक लाईफ सपोर्ट असणाऱ्या ७०४ अशा एकूण ९३७ रुग्णवाहिका महाराष्ट्राला उपलब्ध होणार आहेत. त्यावर आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर्स काम पाहणार आहेत. ही सेवा रोज २४ तास सुरू असेल.
नगर जिल्हय़ासाठी अशा ४० रुग्णवाहिका राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत. त्यामध्ये ९ अ‍ॅडव्हान्स्ड लाईफ सपोर्टच्या तर ३१ बेसिक लाईफ सपोर्टच्या आहेत. या रुग्णवाहिका जिल्हय़ात कोठे कोठे थांबतील याची ठिकाणे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी निश्चित केली आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील ३० डॉक्टरांना नाशिक व पुणे येथील सरकारी रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात आले आहे. रुग्णवाहिकेची सेवाही नागरिकांना विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
उपक्रमात स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचेही योगदान आवश्यक आहे, ज्यांना या उपक्रमाची माहिती हवी असल्यास किंवा सहभागी होण्याची इच्छा असल्यास ९५२७६८२१०८ या मोबाइलवर संपर्क करण्याचे आवाहन डॉ. सय्यद यांनी केले आहे.
डॉक्टरांच्या प्रशिक्षण कार्यक्रमास मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजुरकर, बीव्हीजीचे विभागीय व्यवस्थापक डॉ. विनय यादव, प्रशिक्षक डॉ. श्रद्धा व डॉ. प्रतीक्षा आदी उपस्थित होते.