गेल्या दोन-तीन वर्षांपासून हवामानाचा लहरीपणा अनुभवायला मिळत आहे. विदर्भात होळीच्या आधी असलेल्या थंडाव्याने गेल्या पाच दिवसांपासून पळ काढला आहे. आता उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. चंद्रपूर, वर्धा अकोला या ठिकाणचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्यावर पोहोचले आहे. नागपुरात गेल्या दोन दिवसातील कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस असल्यामुळे गुढीपाडव्यानंतर ४२ ते ४३ अंश सें. टप्पा गाठण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
मंगळवारी अकोला, वर्धामध्ये सर्वाधिक ३७ अंश से. तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपूर व अमरावतीचे तापमान ३८ अंशापर्यंत पोहोचले आहे. साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासून विदर्भात तापमान वाढत असते. मात्र ,यावेळी होळीपूर्वी ३२ ते ३५ अंशापर्यंत विदर्भातील तापमान होते. होळीनंतर तापमानात वाढ झाली असून तापमान ३८ अंशापर्यंत पोहोचले आहे. विदर्भात सगळीकडे उकाडाही जाणवू लागला आहे. या स्थित्यंतराच्या काळात दुपारी कडक ऊन्ह आणि सकाळच्या वेळी थंडी असे वातावरण आहे. मात्र, गेल्या दोन दिवसापासून विदर्भात जास्तीत जास्त भागातून सकाळच्या वेळी अनुभवयाला मिळणारा गारवासुद्धा नाहीसा झाला आहे. तापमान सरासरीच्या वर कायम राहू लागले आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली. दुपारी रत्याने फिरताना अनेक लोक दुपट्टे आणि टोप्याचा वापर करू लागले आहेत. शिवाय घरोघरी अडगळीत ठेवलेले कूलर आणि वातानुकूलित उपकरणे आता खोल्यांमध्ये लागले आहेत. विदर्भात गुरुवारी तापमान पुढीलप्रमाणे- नागपूर ३७.३ अंश से., अकोला ३७.५, अमरावती ३५.८, ब्रह्मपुरी ३५, चंद्रपूर ३५.२ गोंदिया ३६.३ वाशीम ३५, वर्धा ३७.५, बुलढाणा ३४.६ व यवतमाळ ३६ अंश. हा उकाडा आणखी काही दिवस असाच कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. मार्च महिन्याशेवटी पुन्हा थंडी अवतरण्याची शक्यता मावळली आहे, असे नागपूर वेधशाळेकडून सांगण्यात आले.
नागपुरात शुक्रवारी चांगलाच उकाडा जाणवला. दुपारच्यावेळी उष्ण झळांचीही भर पडली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी शहरातील विविध भागात शीतपेयाची दुकाने थाटण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोमात असून उमेदवारांसह कार्यकर्ते प्रचाराच्यावेळी स्कार्फ किंवा दुपट्टा बांधून फिरत आहेत. लोकांच्या घरी अडगळीत ठेवण्यात आलेले कूलर लावण्यात आले असून बाजारात कूलरची विक्री केली जात आहे.