मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा दरवर्षी किमान चार हजार प्रवाशांचा जीव घेत आहे. २००२ ते २०१२ या दहा वर्षांत मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेमार्गावर उपनगरीय भागांत ३९,९७० जणांचा बळी गेला आहे. तर विविध रेल्वे अपघातांत ४०,५२७ जण जखमी झाले आहेत. २०१० ते १२ या तीन वर्षांत सर्वात जास्त प्रवाशांचा जीव हा रेल्वेरूळ ओलांडताना गेला असून ही संख्या ६१५४ एवढी आहे. त्याखालोखाल धावत्या रेल्वेतून पडून २३०४ लोक दगावले आहेत. प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातील ज्या पोकळीबद्दल सर्वच राजकीय पक्षांनी गदारोळ माजवला होता, त्या पोकळीत गेल्या तीन वर्षांत ३३ जणांचे मृत्यू झाले आहेत.
मध्य (हार्बरसह) आणि पश्चिम रेल्वेवरून दरदिवशी तब्बल ८० लाख लोक प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेली भरमसाठ गर्दी, प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईसाठीचा आखडता हात आणि खासदारांची उदासीनता या सर्वच गोष्टींमुळे गेल्या काही वर्षांत मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसाठी एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. गेल्या काही काळात प्लॅटफॉर्म आणि रेल्वे यांतील पोकळीत पडून होणाऱ्या दुर्घटनांबद्दल अनेक लोकप्रतिनिधी व प्रवासी संघटनांनी आवाज उठवला आहे. मात्र आकडेवारीकडे नजर टाकली असता २०१०-१२ या तीन वर्षांत या पोकळीत पडून ३३ जण दगावले असून १८३ जण जखमी झाल्याचे दिसते. त्या तुलनेत रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ६१५४ एवढी असून याच कारणामुळे १८८६ लोक जखमी झाले आहेत.
२००२-२०१२ या दहा वर्षांत सर्वात जास्त म्हणजे ४०२९ अपघाती मृत्यू २००६ मध्ये झाले होते. तर सर्वात कमी म्हणजेच २७९९ मृत्यू २००२ मध्ये झाले. मध्य रेल्वेवरील कुर्ला आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवली या दोन रेल्वे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वात जास्त अपघाती मृत्यूंची नोंद झाली आहे. कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत वर्षांला सरासरी ४५० लोकांचा अपघाती मृत्यू होत असून बोरिवली रेल्वे पोलिसांच्या हद्दीत हा आकडा सरासरी ३८० आहे. हे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलीस विविध अभियाने राबवत असतात. प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात, असे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2014 रोजी प्रकाशित
जीवनवाहिनीचे दहा वर्षांत ४० हजार बळी
मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा दरवर्षी किमान चार हजार प्रवाशांचा जीव घेत आहे. २००२ ते २०१२ या दहा वर्षांत मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेमार्गावर उपनगरीय भागांत ३९,९७० जणांचा बळी गेला आहे.
First published on: 11-04-2014 at 12:46 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life line of mumbai local train killed 40000 in 10 year