कुठला तरी ग्रह बदलल्याने आयुष्यात चांगले-वाईट बदल होतात, यावर माझा विश्वास नाही. कोणाच्याही आयुष्यात त्याच्या कर्मानेच चांगले-वाईट घडत असते, असे मत राशिचक्रकार शरद उपाध्ये यांनी व्यक्त केले. स्वत:चे भविष्य कळावे म्हणून आपण या क्षेत्राकडे वळलो नाही. तर लोक भोगत असलेले दु:ख जाणून घ्यायचे होते. प्रारब्धाविषयीची उत्सुकता या क्षेत्राकडे घेऊन आली, अशा शब्दांत शरद उपाध्ये यांनी राशिभविष्याबद्दलचे भाष्य मांडले. कोपरीतील सुयश कला क्रीडा मंडळाच्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
ज्योतिष शास्त्रातील गमतीजमती यावरील व्याख्यान ऐकायला मोठा श्रोतृवर्ग जमला होता. उपाध्ये पुढे म्हणाले की, माणसाने जप, साधना करावी मात्र सध्याच्या काळात एका हातात जपमाळ आणि सर्व लक्ष टीव्हीवर सुरू असलेल्या मालिकेकडे असते. अशी साधना कोणत्याही उपयोगाची नसते. अशा प्रकारची तासभर पूजा आणि जप करण्यापेक्षा दिवसातील पाच मिनिटे जरी मनापापासून साधना केली तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. माणसाने देवाला गृहीत धरण्याची सवय केली आहे. सोमवारी हा देव, मंगळवार दुसऱ्या देवांचा असे देवांचे वारसुद्धा माणसाने ठरवले आहेत. त्या त्या वारानुसार देवांच्या मंदिरात गर्दी उसळते. तर इतर दिवशी दुसऱ्या मंदिरांमध्ये मात्र शुकशुकाट असतो. इतर दिवशी तो देव पावत नाहीत का असा सवालही त्यांनी या वेळी केला. घरामध्ये गणपती बसवलेला असतानाही नवसाचा गणपती, उजव्या सोंडेचा गणपती करत भरमसाट रांगा लावल्या जातात. त्यासाठी आरक्षण शोधले जाते. पैसेही मोजले जातात. अंबानींचा जन्म झाला. त्याच वेळी दुसरी मुलंही जन्माला आली होती, मात्र सगळेच अंबानी झाले नाहीत, असे का घडते. याविषयीची उत्सुकता शांत बसून देत नव्हती. याची उत्तरे गुरुचरित्र, शिवलीलामृत, देवी भागवतसारख्या ग्रंथांमध्ये सापडली. माणासाला त्रास झाला की तो साडेसाती मागे लागली असे म्हणतो, मात्र विचार केले आणि मागे डोकावून पाहिले की ही तुमची र्कम आहेत, जी वेगवेगळ्या रूपांत तुमच्यासमोर येतात, असे उपाध्ये यांनी स्पष्ट केले.