जिल्हय़ातील काही मंडळी मी म्हणजेच शिवसेना असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा त्यांचा गैरसमज आहे. शिवसेना कोणा एकाची मालमत्ता नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन सेनेचा कार्यकर्ता करील, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी केले.
हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुखपदावर सुहास सामंत, तर संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुखपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर सोमवारी सामंत यांचे जिल्हय़ात प्रथमच आगमन झाले. त्यानिमित्त खासदार सुभाष वानखेडे यांच्या उपस्थितीत नूतन जिल्हाप्रमुख बांगर यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. औंढा तालुक्यातील जवळाबाजार, हिंगोली तसेच कळमनुरी येथे पक्षातर्फे मेळावा, मोटारसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले. परंतु या कार्यक्रमांचा बराच गाजावाजा झाल्याने व सेनेंतर्गत गटबाजीच्या चर्चेमुळे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा व माजी आमदार गजानन घुगे यांचे समर्थक या कार्यक्रमांना जाणार किंवा नाही, याची मोठी उत्सुकता होती. या दोन्ही माजी आमदारांचे समर्थक जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष उद्धवराज गायकवाड, पदाधिकारी, जवळाबाजार येथील बाजार समितीचे सभापती अंकुश आहेर, सतीश सोमानी, सुनील काळे आदींनी कार्यक्रमाकडे पाठच फिरविली.
हिंगोली शहरातील कार्यक्रम आटोपून खासदार वानखेडे यांच्या उपस्थितीत संपर्कप्रमुख सामंत यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठक घेतली. बांगर, जि.प. सदस्य अशोक हरण, रामेश्वर शिंदे यांच्यासह काही मोजकेच शिवसैनिक उपस्थित होते. सामंत यांनी सांगितले, की वानखेडे यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला असून त्याची घोषणा होणे बाकी आहे. विधानसभेच्या उमेदवारीबाबत विचारले असता, त्याला वेळ असून उमेदवार कोण हे आजच ठरवता येणार नाही. मात्र, शिवसेनेचा धनुष्यबाण हाच उमेदवार मानला जातो, असे ते म्हणाले. जिल्हय़ातील गटबाजीवर विचारले असता ते म्हणाले, की मुंदडा व घुगे यांना उद्धव ठाकरे यांनी भेटण्यास वेळ दिला नसल्याचे व त्यामुळे ही मंडळी नाराज असल्याचे समजले आहे. कामाच्या व्यापात कदाचित तसे घडले असावे. मात्र, मी या नाराज मंडळींची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत भेट घडवून आणण्यास तयार असल्याचे सांगून वानखेडे मला जवळचे आहेत, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.
माझी नेमणूक पक्षहिताच्या दृष्टीने झाली. मी कोणा गटातटाचा नाही. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यास मी काम करेन. येथील गटबाजी दोन महिन्यांत दूर करण्याचा प्रयत्न करेन. सर्वाना सोबत घेऊन काम करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. जि.प.तील गटबाजी व कार्यक्रमात घुगे-मुंदडा समर्थकांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता त्यांची नाराजी असल्याची कबुली त्यांनी दिली.
एकीकडे गटबाजी व नाराजी दूर करून सर्वाना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगणाऱ्या सामंत यांनी मात्र शिवसेना हा कोणा एकाच्या मालकीचा पक्ष नाही. जे कोणी मी नाही तर शिवसेना नाही, असा समज पसरवीत आहेत, तसेच आपल्यामुळेच शिवसेना असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांचा हा गोड गैरसमज असल्याचा टोला त्यांनी लगावला.
कार्यकर्त्यांमुळे पक्ष मोठा होतो. पक्षापेक्षा कोणी मोठे नाही. जे कार्यकर्ते पक्षासाठी जिवाचे रान करीत परिश्रम घेतात, त्यांनाच पक्षात महत्त्वाचे स्थान आहे. पक्षप्रमुख ठाकरे देतील त्या आदेशाचे पालन पक्षाचा कार्यकर्ता म्हणून करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 9th Oct 2013 रोजी प्रकाशित
शिवसेना कोणा एकाची मालमत्ता नाही- सामंत
जिल्हय़ातील काही मंडळी मी म्हणजेच शिवसेना असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेना कोणा एकाची मालमत्ता नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन कार्यकर्ता करील, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी केले.

First published on: 09-10-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena is not proparty of anyone suhas samant