शहरातील वृक्षमोजणीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता का, असा सवाल उपस्थित करून स्थायी समितीतील तीन सदस्यांनी जीपीआरएस पद्धतीने कराव्या लागणाऱ्या वृक्षमोजणी प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या सभेत खोडा घातला. त्यामुळे शहरातील झाडांची मोजणी आता लांबणीवर पडली आहे.
ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनाचे काम कासवगतीने सुरू असून बेलापूर येथील मुख्यालयाच्या कामाला ज्या पद्धतीने गती देण्यात आली होती त्या पद्धतीने या कामाला देण्यात आली नसल्याची तक्रार शिवसेनेचे सदस्य मनोज हळदणकर यांनी केली. या एका प्रकल्पावरून शिवसेनेने सत्ताधारी राष्ट्रवादीला खिंडीत पकडल्याचे चित्र निर्माण झाले होते.
सुमारे १०८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या नवी मुंबई पालिका क्षेत्रात सिडकोने लावलेले हजारो वृक्ष आहेत. पालिका या वृक्षांची दर वर्षी गणना करीत असते. या वेळी ही गणना जीपीआरएस या आधुनिक पद्धतीने करण्याचा ९० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाने मंजूर करून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यावर शिवसेनेचे विठ्ठल मोरे, राष्ट्रवादीचे एम. के. मढवी, शिवराम पाटील यांनी आक्षेप घेतला.
सदर प्रस्तावाला महासभेची प्रशासकीय मंजुरी आहे का, असा सवाल या तीन सदस्यांनी केला. अशी मंजुरी असण्याची आवश्यता नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आले पण त्यावर सदस्यांचे समाधान न झाल्याने हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला. या वेळी ऐरोली येथील आंबेडकर भवनाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. या भवनामध्ये एक कोटी ३८ लाख रुपये खर्चाची वातानुकूलन यंत्रणा बसविण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली.
या वेळी हळदणकर यांनी मुख्यालयाच्या कामाएवढीदेखील गती त्या कामाला नसल्याचे सांगितले. मुख्यालयाच्या कामावर आर्किटेक्टसारखा एक नेता लक्ष ठेवून होता पण आंबेडकर भवनाच्या कामावर त्यांचे लक्ष नाही. माजी खासदार संजीव नाईक यांचे नाव न घेता हा टोला मारण्यात आला होता. नाईक मुख्यालयाचे काम लवकर व्हावे यासाठी खूप आग्रही होते. त्यासाठी ते मुख्यालयाच्या कामावर जातीने हजर राहत होते.