बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे प्रथमच नाशकात

शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर प्रथमच नाशिकला येणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी येथे होणाऱ्या नाशिक विभागीय मार्गदर्शन मेळाव्याकडे केवळ शिवसैनिकच नव्हे तर, सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये मनसेच्या स्थापनेनंतर अंतर्गत राजकारण व हेव्या-दाव्यांमुळे या गडाचे बुरूज एक एक करून ढासळू लागले. त्याची परिणती महापालिकेची सत्ता गमाविण्यात झाली. काही पराभूत माजी नगरसेवकांनी मनसेची वाट धरली. दुसरीकडे ग्रामीण भागातील शिवसैनिकांना कोणीच वाली राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले. अशी अवस्था असतानाच बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेल्या पोरकेपणाच्या भावनेला या निमित्ताने आधार देतानाच आता ‘रडायचे नाही तर, लढायचे’ असा संदेश देण्याचा पक्षाच्या धुरिणांचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरात सकाळी अकरा वाजता हा मेळावा होणार आहे. त्यास ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, खा. संजय राऊत, आ. दिवाकर रावते, आ. नीलम गोऱ्हे, लिलाधर डाके आदी नेतेही उपस्थित राहणार आहेत.
नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार भागातील लोकप्रतिनिधी, जिल्हाप्रमुख, आजी-माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्यही मेळाव्यात सहभागी होणार आहेत. शिवसेनाप्रमुखांचे निधन आणि नाशिक महापालिका निवडणुकीतील पराभव यानंतर कार्याध्यक्ष प्रथमच जाहीर कार्यक्रमासाठी येत असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला सर्व तयारी पूर्णत्वास नेली. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौऱ्याचे नियोजन केले आहे. कोल्हापूर येथून त्याची सुरूवात झाल्यावर संवाद साधण्यासाठी ते नाशिकला येत असल्याने शिवसैनिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे आपला हा दौरा राजकीय नसल्याचे उध्दव ठाकरे यांनी याआधीच स्पष्ट केले असतानाही इतर राजकीय पक्षांचे या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी शिवसेनेच्या पुढील वाटचालीची दिशा कशी राहणार, याचा अंदाज घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवसेनाप्रमुख व नाशिक यांचा ऋणानुबंध प्रदीर्घ काळ राहिला. तो अधिक दृढ करण्याचा सेनेचा प्रयत्न असला तरी काही वर्षांत पुलाखालून इतके पाणी वाहून गेले की, केवळ गटातटातील वाद-विवादांपुरतेच पक्षाचे अस्तित्व जाणवू लागले. उत्तर महाराष्ट्रातील केवळ नाशिकचा विचार करता या जिल्ह्यात पक्षाचे चार आमदार असून आपल्या कार्यक्षेत्रात संघटना बांधणीसाठी त्यांनी नेमके किती योगदान दिले, याचे कोणतेही मोजमाप पक्षातंर्गत होत नसल्याची सध्याची परिस्थिती आहे. त्यातील बहुतेकांनी सत्ताधारी पक्षाच्या दिग्गज नेत्यांशी हातमिळवणी करून आपले राजकारण सुरू ठेवले आहे.
परिणामी, ग्रामीणच्या जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी कितीही धडपड केली तरी त्यांचे प्रयत्न तोकडे पडतात. जसे स्थानिक लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागात संघटनेला हात दाखविला, तसेच अनुकरण मुंबईहून नाशिकच्या वाऱ्या करणारे आतापर्यंतचे संपर्कनेते व इतर नेत्यांनीही केल्याची शिवसैनिकांची भावना आहे. नाशिक महापालिकेतील राजकारणासाठी येणाऱ्या या नेत्यांनी ग्रामीण भागाची साधी दखल घेण्याचेही औदार्य दाखविले नाही. अर्थात त्यास उध्दव ठाकरे यांचे राजकारणही जबाबदार असल्याचे म्हटले जाते. मागील विधानसभा निवडणुकीत नांदगाव आणि येवला मतदारसंघात भुजबळ परिवारातील सदस्य उमेदवार असताना त्यांच्या विरोधात लढणाऱ्या शिवसेना उमेदवारांना बळ देण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अचानक वेगवेगळे कारण देत या दोन्ही ठिकाणच्या सभा रद्द झाल्या. तर, निफाड येथे मात्र सभा झाली. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्येही विचित्र संदेश गेला आणि शिवसेनेच्या उमेदवारांचे अवसानच गळाले. अर्थात आता हा इतिहास झाला आहे. परंतु इतिहास हा बोध घेण्यासाठी आणि घडलेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी असतो, असे म्हटले जाते.
शहरातील पक्षाचे संपूर्ण राजकारण केवळ महापालिकेभोवती फिरते. त्यात इतके गट व तट आहेत, की कोण नेमक्या कोणत्या गटात आहे, हे समजणेही अवघड. या वादाला कंटाळून प्रदीर्घ काळापासूनचा मित्रपक्ष भाजपही दुरावला गेला तरी त्याचे सोयरसूतक स्थानिकांना वाटले नाही. पालिकेतील पराभवानंतर बरखास्त झालेल्या शहर कार्यकारिणीची अद्याप घोषणा झालेली नाही. परिणामी, कोणाचे कोणावर नियंत्रण नाही. मुंबईच्या नेत्यांशी संधान साधून बहुतेक जण आपला राजकीय स्वार्थ साधून घेण्यात मग्न आहेत. या स्थितीचा लाभ घेत मनसेने आपले पाय घट्टपणे रोवून ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत केले असताना शिवसेना आहे ती ताकद गमावून बसल्याचे दिसत आहे.
या पाश्र्वभूमीवर, अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच नाशिकला येणारे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे शिवसैनिकांना नेमके काय मार्गदर्शन करणार, स्थानिक पातळीवर पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा योग्य पद्धतीने बसविण्यासाठी काय निर्णय घेतात, पक्षांतर्गत कुरघोडीला कसा लगाम घालतात, आदींची उत्सुकता सर्वाना आहे.