Success Story: स्त्रिया समाजाचा अविभाज्य घटक आहेत आणि कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उभारणी आणि विकासात त्यांची अतुलनीय भूमिका आहे. यशाच्या मार्गात अनेकदा अडथळे हे येतातच, पण ते अडथळे पार करून पुढे जायचं असतं. आपण अशाच एका महिलेची कहाणी आज जाणून घेणार आहोत, ज्यांनी कठीण परिस्थितीतही हार मानली नाही. दोन मुलांची जबाबदारी पेलत त्यांनी कठीण काळात व्यवसाय तर सांभाळलाच, पण तो नफ्यातही नेला. ही कहाणी आहे मीरा कुलकर्णी यांची. भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

आजही अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना बऱ्याच संघर्षानंतर यश मिळते. यापैकी एक म्हणजे मीरा कुलकर्णी. मीरा या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि सुप्रसिद्ध स्किनकेअर ब्रँडपैकी एक असलेल्या आघाडीची आयुर्वेद कंपनी फॉरेस्ट एसेंशियल्सच्या त्या संस्थापक आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या कंपनीच्या संस्थापिका होण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्षांचा सामना करावा लागला आहे.

टिहरी गढवाल, ऋषिकेश येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मीरा यांचे बालपण अगदी सामान्य होते. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्या पतीच्या व्यवसायात अडचणी येऊ लागल्या आणि ते व्यसनाच्या आहारी गेले. त्यानंतर त्या पतीपासून विभक्त झाल्या. २८ व्या वर्षी दोन मुलांना घेऊन राहत होत्या एवढ्यातच त्यांच्यावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या आई-वडिलांचेही निधन झाले. या संकटकाळी त्या एकट्या पडल्या. पण खचून न जाता त्यांनी आयुष्यात पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला.

वयाच्या ४५ व्या वर्षी मीरा यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय केला. त्यानंतर हळूहळू त्यांनी हाताने बनवण्यात आलेले साबण विकण्यास सुरुवात केली. २००० साली मीरा यांनी फॉरेस्ट एसेंशियल्स (Forest Essentials) या कंपनीची स्थापना केली. फॉरेस्ट एसेंशियल्स नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने तयार करणारी भारतातील आघाडीची आयुर्वेद कंपनी आहे.

एका मुलाखतीत मीरा यांनी सांगितले की, २००२ च्या सुरुवातीपर्यंत त्यांनी दोन वर्षे सतत मेहनत केली. सुरुवातीला त्यांनी एका छोट्या गॅरेजमध्ये आपल्या कंपनीची सुरुवात केली, पण हळूहळू भारतातील २८ शहरांमध्ये फॉरेस्ट एसेंशियल्स कंपनीने आपल्या शाखा उघडल्या. केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने मीरा यांनी फॉरेस्ट एसेंशियल्स कंपनीची सुरुवात केली. आज भारतात या कंपनीच्या ११० हून अधिक शाखा आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोटक वेल्थ हुरुन यांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार मीरा यांचा समावेश भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत होतो. त्यांची एकूण संपत्ती १ हजार २९० कोटी रुपये आहे. मीरा यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.