Chanakya Niti for Women: आचार्य चाणक्य यांनी आपले जीवन सुखी, समाधानी व सुंदर बनवण्यासाठी अनेक लहान सहान बारकावे सांगितल्याचे मानले जाते. आचार्यांचे हे बोध आज जगभरात चाणक्य नीती रूपात प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य म्हणतात की, अनेकदा आपण स्वतःच्या आनंदासाठी इतरांवर अवलंबून असतो पण असं केल्याने ना आपण आनंदी राहू शकतो ना ज्याच्याकडून आपल्याला अपेक्षा आहेत त्याला सुख प्राप्ती होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्वच स्त्री व पुरुषांनी स्वतःच्या वागणुकीबाबत सतर्क राहून त्याचा सर्वात आधी स्वतःवर व मग आपल्या जवळच्या व्यक्तींवर व ओघाओघाने समाजावर काय परिणाम होतो हे जाणून घ्यायला हवे. अन्य अनेक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महिला आपल्या भावना नियंत्रणात ठेवण्याबाबत मात्र काहीश्या कमकुवत ठरू शकतात. चाणक्य सांगतात की, अशा महिलांनी किमान स्वतःच्या सुखासाठी तीन गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात, त्या कोणत्या हे आता आपण जाणून घेऊयात…
महिलांनी चुकूनही करू नका ‘या’ चुका
आजारांकडे दुर्लक्ष
महिला प्रत्येक बाबतीत सतर्क असतात पण याला त्यांचे स्वतःचेच आरोग्य अपवाद म्हणतात येईल. म्हणजेच अनेकदा कामाच्या रगाड्यात, घरातील जबाबदाऱ्यांमुळे महिला स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत नाहीत परिणामी अनेक दुर्धर आजारांना सामना करावा लागू शकतो. तुम्ही एक बाब लक्षात घ्या की तुम्ही ठणठणीत असाल तरच तुमची इतर कामे होणार आहेत त्यामुळे चुकूनही त्रास अंगावर काढू नका. आजवरच्या वैद्यकीय प्रकरणांमध्ये कॅन्सरसारखे गंभीर आजारही केवळ दुर्लक्ष केल्याने बळावल्याने दिसून आले आहे, अशावेळी तुमच्या प्राधान्यक्रमात नेहमी आरोग्यासाठी पहिले स्थान राखीव ठेवा.
अपेक्षा.. अपेक्षा व अपेक्षा!
महिलांचा स्वभाव हा भरभरून देणारा मानला जातो. आपल्याला आपल्या,कुटुंबासाठी, मित्र परिवारासाठी, जोडीदारासाठी नेहमीच काही ना काही खास करायचा उत्साह असतो. यात गैर काहीच नाही मात्र त्याआधी तुम्ही स्वतःला हे ठणकावून सांगायला हवे की मी जे काही करेन त्याचा मूळ हेतू हा समोरच्याला झालेल्या आनंदात आपला आनंद शोधणे हा आहे, या बदल्यात मलाही अशीच वागणूक मिळेल अशी माझी अपेक्षा नाही. जर आपल्याला हे शक्य नसेल तर समोरच्यासाठी काही करणे टाळल्यास हिताचे ठरू शकते, उलट ज्या गोष्टीची अपेक्षा तुम्ही त्या व्यक्तीकडून करत आहात ती गोष्ट स्वतःच पूर्ण करू शकता.अपेक्षा नसताना मिळालेले सुख व उलट अपेक्षाभंगाचे दुःख यातील अंतर आपणच दूर करायचे आहे.
अति समजूतदारपणा
अति तिथे माती ही म्हण आपणही ऐकून असाल, अर्थात संसार सुखाचा करण्यासाठी समजूतदारपणा गाठीशी असावाच लागतो, पण जेव्हा केवळ तुम्हालाच समजूतदारपणा दाखवावा लागतो तेव्हा समस्यां सुरु होऊ शकतात. नवरा किंवा कुटुंबाची प्रत्येक गोष्ट ऐकायलाच हवी असा नियम नाही जिथे तुम्हाला तुमचं मन स्पष्ट संकेत देत असेल तिथे स्वतःला प्राधान्य देणे फायद्याचे ठरू शकते. इतरांचं मन न दुखावता तुम्ही स्वतःला आनंदी ठेवायला हवं आणि यासाठी नेहमी स्वतःचा विचार बाजूला ठेवणं हा पर्याय असूच शकत नाही.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)