‘‘रोहन, तुझ्या ताईची परीक्षा सुरू आहे ना सध्या? कसे गेले तिला पेपर्स? आणि तिची परीक्षा म्हणजे तुमची सगळ्यांची गडबड असेल ना?’’ किशोर रोहनला काळजीयुक्त स्वरात विचारत होता. त्यावर रोहन मात्र गालातल्या गालात हसत होता. कारण रोहनच्या घरी किशोर म्हणतो तशी कोणतीच गडबड नव्हती. त्याच्या ताईची परीक्षा जरी असली तरी ताई कूऽऽऽल होती आणि बाकी सारेही एकदम शांत होते. परीक्षा, अभ्यास वगैरे चालू होतंच ताईचं, पण त्यामुळे कोणतीही गडबड वा गोंधळ वगैरे होत नव्हता घरात.

हे सगळं कसं सांगू किशोरला, या विचारात रोहन गढला होता. त्यावेळीच किशोर म्हणाला, ‘‘अरे, एवढे चिंतेत असाल तुम्ही सगळे ताईच्या परीक्षेमुळे, बापरे, कसं होणार रे आता?’’ हे ऐकून मात्र रोहनला हसू आवरेनाच. ‘‘अरे बाबा, आम्हाला ताईच्या परीक्षेची कोणतीच चिंता नाही हे तुला कसं सांगावं याची चिंता पडली होती मला काही वेळ आणि म्हणून मी चिंतेत दिसलो तुला. आजी असताना आम्हाला कसली काळजी? परीक्षेच्या दिवसांत आनंदी, समाधानी आणि प्रसन्न म्हणजेच सुखी कसं राहायचं याचं इंगितच सगितलं आहे आजीनं ताईला आणि बरोबर आम्हा सगळ्यांनाही.

हेही वाचा…बालमैफल : नीट कान देऊन ऐक!

आजी म्हणते, ‘‘परीक्षेच्या वेळी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. इतर गोष्टी बाजूला ठेवाव्यात. त्यामुळे ताण आपोआपच कमी होतो. दिवास्वप्न अजिबात पाहायची नाहीत असं बजावलंच आहे तिनं ताईला. जे आहे ते कबूल करायचं, म्हणजे ‘जे येतं ते येतं म्हणावं आणि जे येत नाही ते नाही म्हणावं’ एवढं सोपं आहे परीक्षा म्हणजे असं म्हणते ती. परीक्षेनंतर काय? याचा विचार परीक्षेच्या काळात करू नये, तो करायचा परीक्षेनंतर वेळ असतो असंही समजावलं आजीनं आम्हाला. यामुळे परीक्षेचा ताण, परीक्षेनंतरचा ताण, धाकधूक एकदम कमी झाली आणि ताईसकट आम्ही सगळे एकदम सुखी झालो.’’ रोहन हसत हसत म्हणाला.

हेही वाचा…बालमैफल : मांजरीचं प्रेम..

समोरच्या ताटात जे वाढलंय त्याचा नाक, डोळे, हात आणि जीभ यांनी घेता येईल तेवढा आस्वाद घ्यावा, उगाचच ताटात काय नाही याचा विचार करू नये. किंवा यानंतर असंच जेवण मिळेल का नाही याची चिंताही!

joshimeghana.23@gmail.com