scorecardresearch

Premium

राजकीय नेते ‘बडव्यां’चा उल्लेख करतात, हे ‘बडवे’ म्हणजे कोण ? काय आहे बडव्यांचा इतिहास

विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे’, ‘विठ्ठलाच्या दर्शनात बडवे मधे आले’ असा आशय त्यातून व्यक्त होतो. या विधानांमध्ये सातत्याने येणारे ‘बडवे’ आहेत तरी कोण? बडव्यांच्या इतिहास काय आहे? आणि नकारात्मक अर्थाने बडव्यांच्या उल्लेख का केला जातो? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

history_of_badave_who_is_badave_Loksatta
काय आहे बडव्यांचा इतिहास (ग्राफिक्स : लोकसत्ता.कॉम ग्राफिक्स टीम)

वर्षभर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान असो किंवा या वर्षी मंत्री छगन भुजबळ वा जयंत पाटील यांचे विधान असो; ‘विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे’, ‘विठ्ठलाच्या दर्शनात बडवे मधे आले’ असा आशय त्यातून व्यक्त होतो. या विधानांमध्ये सातत्याने येणारे ‘बडवे’ आहेत तरी कोण? बडव्यांचा इतिहास काय आहे? आणि नकारात्मक अर्थाने बडव्यांचा उल्लेख का केला जातो? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

बडवे म्हणजे काय ?

बडवे हे घराण्याचे नाव आहे. राजपूतांमध्येही ‘बडवे’ घराणी आढळतात. ‘बडवे’ म्हणजे मोठे किंवा अधिक मान असणारे, सन्माननीय. बडवे या नावाचा उल्लेख अभंगांमध्येही आला आहे. काहींच्या मते, ‘बरवा’ शब्दापासून ‘बडवा’ शब्द आला असण्याची शक्यता आहे.

vinoba bhave
गांधीजींच्या सहवासाचा अनुभव
s.s. swaminathanProfessor M S Swaminathan, Farmer , Farmer Scientist ,revolution in agriculture
एम. एस. स्वामिनाथन.. शेतकऱ्यांचे शास्त्रज्ञ
M S Swaminathan, father of India's Green Revolution, renowned Indian agricultural scientist, Indian Agricultural Research Institute
अग्रलेख : सदा-हरित!
ncp leader praful patel, praful patel on sharad pawar, praful patel and sharad pawar image, praful patel photo with sharad pawar
प्रफुल्ल पटेल म्हणतात, “शरद पवारांसोबतचे ‘ते’ छायाचित्र आयुष्यातील एक…”

कोण असतात हे बडवे ?

सतत उल्लेख येणारे बडवे घराणे पंढरपूरचे आहे. विठ्ठलाचे पुजारी म्हणजेच बडवे. बडवे हे विठोबाची परंपरेने सेवा करणारे एक घर होते. बडवे हे त्यांचे आडनाव. कमीत कमी एक हजार वर्षांपासून म्हणजे ज्ञानेश्वरमाऊलींच्या आधीपासून हे घराणे पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करत असल्याचे पुरावे सापडतात. पांडुरंगाच्या पूजेचा मान पिढ्यानपिढ्या याच घराण्याकडे होता. या घराण्यात प्रल्हाद महाराज बडवे यांच्यासारखे महंतदेखील झाले आहेत. पंढरपूर शहरावर जेव्हा नैसर्गिक संकट आले, हल्ले झाले, तेव्हा त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण केले. पंढरपूरच्या मंदिरातील पूजेसह पंढरपूरच्या मंदिराचे नित्योपचार करणे, व्यवस्थापन बघणे, अशी कामे ते करीत.

हेही वाचा : विश्लेषण : विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते ? काय आहे विठ्ठल देवतेचा इतिहास

बडवे नावाला नकारात्मक वलय का मिळाले ?

मंदिराचे व्यवस्थापन बघत असताना हळूहळू या घराण्याने विठ्ठल मंदिरावर मक्तेदारी दर्शवण्यास सुरुवात केली, असे म्हटले जाते. त्यांनी वारकऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. संत चोखामेळासारख्या संतांनीदेखील त्यांच्या अभंगातून बडव्यांकडून त्रास होत असल्याबद्दल विठ्ठलाकडे नाराजी व्यक्त केली आहे.

धांव घाली विठू आतां चालूं नको मंद ।
बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ।।
असे संत चोखामेळांनी अभंगात लिहिल्याचे आढळते.
जवळपास १०० हून अधिक वर्षे बडवे आणि वारकरी समाज यांच्यात वाद सुरू होते. विठ्ठलाच्या दर्शनामध्ये बडव्यांची येणारी आडकाठी, अपुरे नियोजन, बडव्यांचे वाढलेले वर्चस्व यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. १९६७ साली सर्वप्रथम राज्य शासनाकडून एक समिती स्थापन करण्यात आली. विठ्ठल मंदिरावरील बडवे घराण्याचे परंपरागत अधिकार काढून घेण्यासाठी या समितीने अहवाल सादर केला. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कायदा १९७३ अस्तित्वात आला. या कायद्याद्वारे विठ्ठल मंदिरावर हक्क दाखवणाऱ्या सर्वांचे अधिकार गोठवण्यात आले. त्याविरोधात बडव्यांनी १९७४ मध्ये याचिका दाखल केली. त्यामध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कायदा १९७३ हा आपल्यावरील अन्याय आहे, असे म्हटले आहे. त्यासाठी ४० वर्षे बडव्यांनी न्यायालयीन लढा दिला; परंतु, सर्व निकाल बडवे घराण्याच्या विरोधात लागले. १४ जानेवारी २०१४ रोजी विठ्ठल मंदिर संपूर्णपणे शासनाच्या ताब्यात आले.

हेही वाचा : रुक्मिणीच्या स्त्रीसुलभ भावना विठ्ठलापासून वेगळे राहण्यास कारण ठरल्या का ? काय आहेत रुक्मिणीच्या दंतकथा

बडवे आणि राजकारण

महाराष्ट्राच्या जनतेवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे. बडव्यांनी वारकऱ्यांना जो त्रास दिला, त्यातून त्यांची भावना झाली की, विठ्ठलाचे दर्शन घेताना आम्हाला बडवे त्रास देतात. म्हणून महाराष्ट्रात आपल्या नेत्याच्या आसपास असणारे लोक जे नेता आणि आपल्यात अडथळा ठरतात, त्यांना ‘बडवे’ म्हणण्यास सुरुवात झाली. राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा ते म्हणाले होते, “शिवसेनाप्रमुखच माझे दैवत आहे. मात्र, या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं असून त्यांच्यासोबत मला काम करायची इच्छा नाही. माझा लढा हा विठ्ठलाशी नाही; त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे.”
संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात उद्धव ठाकरेंच्या बाजूला दोन- बडवे आहेत, असा उल्लेख केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये शिवसेना सोडताना सांगितले होते की, बडव्यांमुळे त्यांना विठ्ठलाचे दर्शन होत नव्हते. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाविषयी बोलताना जयंत पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ‘बडव्यांनी विठ्ठलाला घेरले आहे’, असे वक्तव्य केले. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात नेता आणि कार्यकर्ता यांच्यात दुरावा निर्माण करणाऱ्या व्यक्तींसाठी बडवे हा शब्द सूचकपणे वापरण्याची पद्धत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All the political leaders mention badve who is this badve what is the history of badve vvk

First published on: 06-07-2023 at 15:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×