मुंबई : इस्रायल-हमासदरम्यान संघर्ष अधिक तीव्र झाल्याने त्यापरिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी तुफान समभाग विक्रीचा मारा केला. परिणामी सलग सहाव्या सत्रात मंदीवाल्यांनी पकड घट्ट केल्याने सेन्सेक्स ९०० अंशांनी घसरून ६४,००० अंशाच्या पातळीखाली घसरला. जागतिक बाजारातील निराशाजनक वातावरणामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी वाहन निर्मिती, ऊर्जा आणि वित्त कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री केली.गुरुवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९००.९१ अंशांनी घसरून ६४,००० अंशांच्या खाली ६३,१४८.१५ पातळीवर स्थिरावला

दिवसभरात त्याने ९५६.०८ अंश गमावत ६३,०९२.९८ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशनाक निफ्टीमध्ये २६४.९० अंशांची पडझड झाली आणि तो १८,८५७.२५ पातळीवर स्थिरावला. १७ ऑक्टोबरपासून सेन्सेक्स ३,२७९.९४ अंशांनी म्हणजेच ४.९३ टक्क्यांनी घसरला आहे, तर निफ्टीने ९५४.४५ अंश म्हणजेच ४.८१ टक्क्यांची माघार घेतली.आतापर्यंत कंपन्यांनी सप्टेंबर तिमाहीतील जाहीर केलेली आर्थिक कामगिरी निराशाजनक राहिली आहे. विकसित अर्थव्यवस्थांमध्येही अशीच निराशा निदर्शनास येत आहे. कंपन्यांचे घसरलेले उत्पन्न आणि भू-राजकीय तणाव आणि त्यापरिणामी महागाईला रोखण्यासाठी मध्यवर्ती बँकांकडून पुन्हा एकदा व्याजदर वाढीच्या शक्यतेने मंदीची भीती पुन्हा सतावू लागली आहे. तसेच वायदे बाजारातील करार मुदत समाप्तीच्या पार्श्व् भूमीवर बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्रच्या समभागात ४.०६ टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, एचडीएफसी बँक, टेक महिंद्र, टाटा मोटर्स आणि लार्सन अँड टुब्रोचे समभाग पिछाडीवर होते. तर याउलट, अॅक्सिस बँक, आयटीसी, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एनटीपीसी आणि इंडसइंड बँकेचे समभाग तेजीत होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात ४,२३६.६० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

हेही वाचा >>>चांदीच्या दरानं ७२ हजार रुपये केले पार, सोन्याचे भावही वाढले, तुमच्या शहरात किंमत किती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुंतवणूदारांचे १७.५० लाख कोटींचे नुकसान

गुरुवारच्या सत्रात झालेल्या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांना एका सत्रात २.९५ लाख कोटींचा फटका बसला. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल ३०६.२७ लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. गेल्या सहा सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे १७.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.