Success story: आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्यावर मात करून जी व्यक्ती प्रयत्न करते, ती नक्कीच यशस्वी होते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर अपयश आलं, तर खचून जायचं कारण नाही. याच अपयशातून शिकून पुढे यशाची पायरी चढायची जिद्द निर्माण होते. इच्छाशक्ती म्हणजे काय? ते श्रीश कुलकर्णी याच्याकडून शिकावं… अनेक विद्यार्थी एखाद्या नामांकित संस्थेमधून इंजिनियरिंग शिक्षण पूर्ण करून, इंजिनियरिंग विश्वात आपलं भविष्य घडवू पाहतात. जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्सच्या परीक्षेत ते चांगले गुण मिळवून आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचं स्वप्न पाहतात. असंच स्वप्न पुण्याच्या श्रीशनंही पाहिलं नाही, तर ते सत्यातही उतरवून दाखवलं.

शारीरिकदृष्ट्या विकलांग विद्यार्थी असल्यानं मला माहीत होतं…

श्रीश सांगतो, ” मला शालेय दिवसांपासूनच जेईई परीक्षा देण्याची इच्छा होती. विशेषतः जेव्हा मला गणित आणि विज्ञान या विषयांत रस निर्माण झाला. मला नेहमीच आव्हानात्मक समस्या सोडविण्यात आनंद मिळत असे आणि जेईई हे माझ्या मर्यादांची चाचणी घेण्यासाठी अंतिम व्यासपीठ वाटले. माझ्या वडिलांना पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये सल्लागार म्हणून काम करताना पाहणे आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रातील गुंतागुंत सांगताना ऐकून माझे अभियांत्रिकीबद्दलचं कुतूहल आणखी वाढलं. मला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं होतं. मला वास्तविक जगातील समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधायचे होते. शारीरिकदृष्ट्या विकलांग विद्यार्थी असल्यानं मला माहीत होतं की, हा मार्ग सोपा असणार नाही.”

माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट

त्याने पुढे अधिक माहिती दे सांगितले, “जेईईची तयारी हा एक कठीण प्रवास होता. मी पुण्यातील IITians शिक्षण केंद्र (IITPK) मध्ये प्रवेश घेतला, तेथील प्रेरणादायी मार्गदर्शक व प्रेरणादायी वातावरणामुळे मला एकाग्रता साधण्यास मदत झाली. माझ्या जेईईच्या तयारीबरोबरच मला माझ्या बोर्डाच्या परीक्षेतही समतोल साधावा लागला. आयआयटीने सेट केलेले ७५ टक्के कट ऑफ क्लीयर करणे हे माझे उद्दिष्ट होते. परंतु, मी १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळाल्यानं मला आश्चर्याचा धक्का बसला. माझ्या क्षमतेवरचा माझा विश्वास दृढ करणारा तो अभिमानाचा क्षण होता. २०२४ मध्ये जेव्हा JEE Advanced चा निकाल आला तेव्हा IIT Bombay च्या इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग प्रोग्राममध्ये प्रवेश मिळवण्याचे माझे स्वप्न साकार झाले. मी आता बी.टेक.च्या पहिल्या वर्षात शिकत आहे. आयआयटी बॉम्बेमध्ये पाऊल टाकणे हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. घरापासून दूर राहण्याची माझी पहिलीच वेळ होती आणि सुरुवातीला मला घराबाहेर पडणे कठीण वाटले असले तरी मदत करणाऱ्या मित्रांमुळे मला तेथे रुळण्यास मदत झाली. आयआयटी बॉम्बेमध्ये माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम सुविधा आहेत. सर्व इमारती, लेक्चर हॉल आणि मनोरंजनाची जागा रॅम्प व लिफ्टने सुसज्ज आहेत, ज्यामुळे मला माझ्या व्हीलचेअरवर कॅम्पसमध्ये वावरणे सोपे होते. येथील शैक्षणिक संस्कृती शाळेपेक्षा खूप वेगळी आहे. पूर्वी आम्हाला शिक्षक चमच्याने खायला देत होते आणि स्वयंअभ्यासावर कमी भर दिला जात असे. आयआयटीमध्ये याच्या उलट आहे. प्राध्यापक मार्गदर्शन आणि नोट्स तर देतात; परंतु स्वत: त्याचा अभ्यास करणे, विश्लेषण करणे व शिकणे अपेक्षित आहे. माझ्या JEE च्या तयारीमुळे मला कठीण समस्यांना तोंड देण्याची सवय लागली.”

प्रत्येक दिवस स्वप्नांच्या जवळ घेऊन जाणारा

आयआयटीच्या सर्वोत्कृष्ट पैलूंपैकी एक म्हणजे त्याची सर्वसमावेशकता. प्राध्यापक आणि कर्मचारी सर्वांना फार प्रेमानं सामावून घेत असतात. उदाहरणार्थ- कर्णबधिर विद्यार्थ्यांना त्यांचा शिकण्याचा अनुभव वाढवण्यासाठी अध्यापन सहायक नियुक्त केले जातात आणि ब्रेल व सहाय्यक तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून, प्रवेशयोग्यता आणखी सुधारण्याच्या योजनांबद्दल मी ऐकले आहे. हे माझ्या शाळेच्या आणि महाविद्यालयातील अनुभवांच्या अगदी विरुद्ध आहे. माझ्या इथपर्यंतच्या प्रवासाचा विचार करताना मला जाणवते की, मी आयआयटीमध्ये आल्यापासून माझ्यात किती बदल झाले आहेत. येथील आव्हाने व संधींनी मला अधिक आत्मविश्वास आणि स्वतंत्र व्यक्ती बनण्यास मदत केली आहे. मला कधी कधी घर आणि माझ्या आई-वडिलांची आठवण येते; पण IIT मधील वातावरण आणि मी केलेल्या मैत्रीमुळे हे ठिकाण दुसऱ्या घरासारखे वाटू लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परदेशात मास्टर डिग्रीसाठी जाणं हे माझं आता पुढचं स्वप्न आहे. आतापर्यंत आयआयटी बॉम्बेमधला अनुभव खूप काही शिकवणारा होता. कारण- IIT बॉम्बेमधील प्रत्येक दिवस मला माझ्या स्वप्नांच्या जवळ जाण्यास मदत करीत होता.