Success Story: सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेल्या नलिनी मुंबईकर म्हणजेच नलिनी काकू यांच्या आयुष्यातील प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नलिनी मुंबईकर मुळच्या अलिबागच्या आहेत. त्या १२ वर्षांच्या असताना त्यांची आई देवाघरी गेली, तेव्हा त्या सातवीत होत्या. आईच्या निधनानंतर कुटुंबात त्यांचे वडील, धाकटा भाऊ आणि त्या असे तिघेच होते. मासेमारी हा अलिबागमधील मुख्य व्यवसाय असल्याने त्यांचे वडील समुद्रात मासेमारी करायचे. आईच्या जाण्याने घरी धाकट्या भावाची काळजी घेणारे कोणी नव्हते, म्हणून त्यांना सातवीत शिक्षण सोडावे लागले.
१२ व्या वर्षापासून खांद्यावर पडली घरची जबाबदारी
घर आणि लहान भावाची काळजी घेण्यासह नलिनी वडिलांना मासेमारीत मदत करू लागल्या. १२ वर्षांच्या वयापासून त्या मासेमारी व्यवसायातील बारकावे शिकू लागल्या, तेव्हा त्यांना स्वयंपाक कसा करायचा हे माहीत नव्हते. त्या शेजाऱ्यांच्या घरी जाऊन स्वयंपाक करायला शिकल्या. अशा प्रकारे त्या स्वादिष्ट अन्न बनवू लागल्या. लग्नानंतर त्या सासरच्या घरी गेल्या तेव्हा कुटुंब मोठे असल्याने आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. लग्नानंतर त्यांच्यावर १२ लोकांसाठी जेवण बनवण्याची जबाबदारी होती. नंतर जेव्हा त्यांना दोन मुलं झाली तेव्हा त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या.
पतीची नोकरी गेल्यानंतर सुरू केला मासेमारी व्यवसाय
नलिनी यांच्या पतीची नोकरी गेल्यानंतर त्यांनी मासेमारीचा व्यवसाय सुरू केला. त्या सकाळी ५ वाजता पतीसोबत मासे पकडायला जायच्या. नंतर त्यांना बाजारात विकायच्या. हळूहळू मासेमारीचा व्यवसाय चांगला होऊ लागला आणि घराची आर्थिक परिस्थितीही सुधारू लागली.
त्यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही. शिक्षणानंतर मोठा मुलगा त्यांच्याबरोबर मासेमारीचा व्यवसाय करू लागला, तर धाकटा मुलगा सिव्हिल इंजिनिअर आहे आणि तो सिनेमॅटोग्राफी करतो. त्यांची दोन्ही मुलं या व्यवसायाला पूर्ण पाठिंबा देतात.
सोशल मीडियावर झाल्या प्रसिद्ध
लॉकडाऊनदरम्यान एके दिवशी नलिनी यांच्या धाकट्या मुलाने त्यांच्या स्वयंपाकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. लोकांना तो इतका आवडला की व्हिडीओला एका दिवसात २० लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले. लोकांनी त्यांनी आणखी व्हिडीओ बनवण्याची मागणी करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक व्हिडीओ बनवले. मुलांमुळे त्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या. त्यांना टीव्ही चॅनेलवरही आमंत्रित केले जाऊ लागले. मग त्यांनी पुण्यात ‘सी फूड फेस्टिव्हल’ केला. त्यांच्या हाताला चव आहे, म्हणून त्यांना स्वतःचा ढाबा किंवा हॉटेल उघडायचे होते. पण, ते सुरू करणे शक्य झाले नाही.
त्यांच्या रेसिपीचे व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक विचारायचे की तुम्ही जेवणात कोणते मसाले वापरता. त्यांचे घरगुती मसाले लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी आम्ही त्यांच्या गावातील महिलांना एकत्र केले आणि मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला. काही काळानंतर त्यांनी गावातच एक मसाल्याचे दुकानदेखील उघडले. या दुकानात त्या गावातील महिलांची घरगुती उत्पादनेदेखील ठेवतात. आता त्यांचे मसाले परदेशातही निर्यात होत आहेत. सोशल मीडियावरून कमावलेले पैसे त्या दान करतात.
कोळीनबाय हॉटेल सुरू
अनेक जण नलिनी यांच्या हातचे पदार्थ खाण्याची मागणी करायचे, त्यामुळे अखेर त्यांनी ‘कोळीनबाय’ नावाचे हॉटेल सुरू केले. नलिनी यांच्याबरोबर सध्या अलिबागमधील सुमारे २५०-३०० महिला काम करत आहेत.