– राघव जोशी
मुळात आयुष्याचा अर्थ किंवा आयुष्याचं तत्त्वज्ञान वगैरे या संकल्पना मला काहीशा ‘ओव्हररेटेड’ वाटतात. कारण आयुष्यात प्रत्येक व्यक्ती या प्रश्नाचा तितकासा विचार करत नाही. उत्क्रांतीशास्त्रानुसार प्रत्येक जीवाची खरी गरज ही दैनंदिन संघर्षांतून आपला जीव ‘तगून’ ठेवणं ही आहे, जेणेकरून त्याचं अस्तित्व टिकून राहील. भलेही ते करताना त्याला आनंद वाटो वा दु:ख, निसर्गाला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. त्यामुळेच माणूसही याला अपवाद नाही. जगातील सुमारे ९५ टक्के लोक हे रोज त्या तगून राहण्याचाच विचार करताना दिसतात. मग उरतात ते राहिलेले ५ टक्के लोक, ज्यांना असे अंतर्मुख करणारे प्रश्न पडतात, जे एक तर मुळात विचारी असतात, स्व-जागरूक असतात किंवा सर्वसंगपरित्याग केलेले संन्यासी असतात. समजा, जर तुम्ही मोलमजुरी करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीला ‘तुझ्या आयुष्याचं तत्त्वज्ञान काय?’ असा प्रश्न विचारलात, तर तो तुम्हाला वेडय़ात काढेल! आयुष्य म्हणजे काय, इथून याची सुरुवात होते. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंना जोडणारी सरळ (खरं तर वेडीवाकडी!) रेषा म्हणजे आयुष्य, अशी सहज व्याख्या करणं सोपं आहे. पण ही रेषा अर्थपूर्ण हवी हेही तितकंच महत्त्वाचं; भलेही ती कितीही वेडीवाकडी असो. पण आयुष्याच्या मला उमगलेल्या तत्त्वज्ञानात शिरण्याआधी या अर्थाभोवतीचे जनसामान्यांना असलेले गैरसमज मिटवणं आधी गरजेचं आहे असं वाटतं.
सर्वसाधारणपणे लोक असं मानतात, की मानवी जन्माला खूप काहीतरी भव्यदिव्य असं दैवी प्रयोजन आहे, पण वास्तविक तसं नाही. इतर प्राण्यांप्रमाणे मनुष्य हासुद्धा वैश्विक नियमांना बांधील आहे. फक्त आपल्या बुद्धीच्या जोरावर तो आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावू शकतो इतकंच. याचाच दुसरा अर्थ असा, की तो आपल्या आयुष्याला स्वत:च्या मूल्यांनुसार अर्थ देऊ शकतो. या तत्त्वज्ञानात शिरण्याआधी कोणत्या दोन चष्म्यांतून आयुष्याकडे पाहता येतं ते बघू. पहिला चष्मा आहे व्यक्तिगत दृष्टिकोनाचा. इथे आयुष्याचा अर्थ हा व्यक्तिकेंद्रित असून व्यक्तिगत मूल्यांना इथे जास्त महत्त्व आहे. त्यामुळेच तो अर्थ व्यक्तिसापेक्ष आहे. समजा जर एखाद्या व्यक्तीला मोबाइल फोनवर तासन्तास ओटीटी वाहिन्या बघण्याची सवय असेल आणि ती कृती त्याला अर्थपूर्ण वाटत असेल, तर ती नक्कीच त्याच्या दृष्टीनं अर्थपूर्ण गोष्ट आहे. दुसऱ्या व्यक्तीला तीच कृती वेळेचा अपव्यय वाटू शकेल. कारण ती व्यक्ती सामाजिक चष्म्यातून तिच्याकडे बघत असू शकेल. मग चुकीचं कोण?
सामाजिक मूल्यं मानणाऱ्या व्यक्तींना समाजात आदराचं स्थान असतं. जो माणूस स्वातंत्र्य, नैतिकता, मानवी हक्क, अशा मूल्यांमध्ये आपल्या आयुष्याचा अर्थ शोधतो, तो नंतर महान बनतो. मग नरेंद्रनाथ दत्त यांचे विवेकानंद होतात आणि मोहनदास करमचंद गांधींचे महात्मा गांधी. या व्यक्तींनी आपल्या आयुष्याचा अर्थ, उद्देश हा उच्च मानवी मूल्यांना समर्पित केला असल्यामुळे ते महान झाले. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो प्राथमिकतेचा. कारण आपली मूल्ये आपली प्राथमिकता दर्शवतात आणि सामान्य माणूस कळत नकळतपणे आपल्या प्राथमिकता ठरवत असतो. पण आपल्या समाजव्यवस्थेनंसुद्धा आपल्या प्राथमिकता ठरवून दिल्या आहेत. उदा. अमुक अमुक वयापर्यंत शिक्षण, नंतर लग्न वगैरे. या ठरवून दिलेल्या मार्गावर बरेच जण चालताना आपण आपल्या आजूबाजूला बघतो. त्यामुळे यात वावरणाऱ्या व्यक्तीला आयुष्याचा अर्थ वगैरे गोष्टींचा विचार करण्याची फारशी गरज भासत नाही. जर एखादा चांगला वा वाईट प्रसंग त्या व्यक्तीबरोबर घडतो, तेव्हाच या व्यक्ती अंतर्मुख होऊन अशा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपल्या परीने, आपल्यापुरता करताना दिसतात. आणि मग ती प्राथमिकतेची चौकट गळून पडते आणि वैचारिक स्वातंत्र्याला धुमारे फुटतात. व्हिक्टर फ्रॅन्कल या लेखकाचं प्रसिद्ध वाक्य आहे- If man canlt find deep meaning in his life, he distracts himself with pleasure. प्रत्येकानं भौतिक सुखोपभोगात आयुष्यभर गटांगळय़ा खाण्यापेक्षा आपल्या मूल्यांनुसार आणि सामाजिक चष्म्यानुसार आयुष्याकडे पाहण्यास शिकायला हवं. joshivr20@gmail.com