लष्करी विकास कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण भारतीय बनावटीच्या आणि पाच हजार कि.मी.पर्यंत मारा करू शकणारे अग्नि-५ या आंतरखंडीय क्षेपणास्रासह आयएनएस अरिहंत ही आण्विक पाणबुडीही पुढील वर्षी भारतीय लष्करात दाखल होणार असल्याची माहिती डीआडीओतर्फे शुक्रवारी देण्यात आली.
द्विवार्षिक संरक्षणविषयक प्रदर्शनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डीआरडीओचे प्रमुख अविनाश चंदर यांनी सांगितले की, क्षेपणास्र कार्यक्रमाअंतर्गत भारताकडे अवकाशात उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आहे.तसेच चांगल्या कामासाठीच या कार्यक्रमाचा वापर करण्यावर भारताचा नेहमीच भर असल्याचेही त्यांनी सांगितले.
या क्षेपणास्र कार्यक्रमांतर्गत आणखी दोन तीन चाचण्या करण्यात येणार आहेत. या चाचण्या वर्षभरात पूर्ण करून नंतर सेवेत सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
संपूर्ण भारतीय बनावटीचे अग्नि -५ हे आंतरखंडीय क्षेपणास्र पाच हजार किमीपेक्षा अधिक लांब मारा करू शकते. ५० टन वजनाचे हे क्षेपणास्र १७ मीटर लांब आणि २ मीटर रुंद आहे.
अग्नि क्षेपणास्राच्या मालिकेतील अग्नि-५ हे अत्याधुनिक आणि अतिप्रगत आहे. याआधीची अग्नि-१ ची क्षमता ७०० किमी आहे. तर अग्नि-२ ची मारकक्षमता २००० किमी, अग्नि-३ व ४ ची मारकक्षमता अनुक्रमे दोन हजार ५०० आणि तीन हजार ५०० इतकी आहे.
आयएनएस अरिहंत या आण्विक पाणबुडीच्या समुद्रातील चाचण्या एक दोन महिन्यात सुरू होतील आणि वर्षभरात पूर्ण करण्यात येतील. एकदा का चाचण्या पूर्ण झाल्यानंतर अत्याधुनिक अशी आयएनएस अरिहंत सेवेत दाखल होईल. त्यामुळे नौदलाची क्षमता वाढवण्यास हातभार लावू शकेल