पँगाँग टीएसओ सरोवराच्या परिसरातून माघार घेणाऱ्या चीनला मायदेशात अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागत आहेत.  गलवान खोऱ्यात १५ जूनला रक्तरंजित संघर्ष झाला होता. याबद्दल चीनच्या अधिकृत भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तीन पत्रकारांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. शोध पत्रकार शू झिमिंग यांना शनिवारी नानजिंगमधून अटक करण्यात आली. हे चीन बिथरल्याचे लक्षण आहे.

गलवान खोऱ्यातील संघर्षाबद्दल चीनच्या लष्कराने शुक्रवारी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पाच सैनिकांना सन्मान घोषित केला. पुरस्कार प्राप्त चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर कमांडर दर्जाचा एका अधिकारी गलवान संघर्षात जखमी झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

चीन सरकारने मृतांची जी संख्या जाहीर केलीय, त्यावर शू झिमिंग यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. गलवान संघर्षाच्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या भारतीय सैन्य अधिकाऱ्यांच्या मते ४५ चिनी सैनिक या संघर्षात ठार झाले. उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी यांनी सुद्धा मागच्या आठवड्यात दिलेल्या मुलाखतीत गलवान संघर्षात चीनच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाल्याचे संकेत दिले होते.

चीनमधल्या ब्लॉगर्सनी सुद्धा चिनी सरकारचा दावा मान्य करण्यास नकार देत, जास्त जिवीतहानी झाल्याचे म्हटले आहे. भारताने आपले सैनिक शहीद झाल्याचे लगेच मान्य केले, मग चीनला हीच गोष्ट मान्य करण्यासाठी आठ महिने का लागले? असा सवाल शू झिमिंग यांनी उपस्थित केला. रविवारी बिजींगमध्ये पत्रकाराला याच कारणामुळे अटक करण्यात आली आहे. पण त्याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.