करोनाचा प्रादुर्भाव जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये झाला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली आहे. या कंपन्यामध्ये अगदी गुगल आणि फेसबुकसारख्या बड्या कंपन्यांच्याही मसावेश आहे. आता या दोन कंपन्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांना २०२० संपपर्यंत घरुन काम करण्याची मुभा देणार आहेत. लवकरच दोन्ही कंपन्या यासंदर्भातील औपचारिक घोषणा करणार असल्याचे ‘हिंदुस्तान टाइम्स’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

फेसबुक ६ जुलैपासून आपली सर्व कार्यालये पुन्हा सुरु करण्याच्या विचारात असल्याचे प्रवक्त्यांनी सीएनबीसीशी बोलताना सांगितले आहे. मात्र असं असलं तरी ज्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची इच्छा आहे ते घरुन काम करु शकतात अशी मुभा देण्यात येणार असल्याचे समजते. यासंदर्भात सर्व नियोजन झाले असून कंपनीचा संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झकेरबर्ग याबद्दलची घोषणा करु शकतो. ‘द व्हर्ग’मधील वृत्तानुसार फेसबुकने हा निर्णय घेताना अनेक गोष्टींचा विचार केला आहे. आरोग्य यंत्रणांनी दिलेला इशारा, सरकारने दिलेला इशारा या सर्वांचा विचार करुन कंपनीने काही कर्मचाऱ्यांना कार्यलयातून काम करण्यासंदर्भात परवानगी देऊ शकते. सध्या तरी कंपनीचे अनेक कार्मचारी हे घरुनच काम करत आहेत. याआधीच फेसबुकने २०२१ पर्यंतचे सर्व इव्हेंट रद्द करण्याची घोषणा केली आहे.

फेसबुकबरोबरच गुगलनेही आपल्या कर्मचाऱ्यांना २०२० संपेपर्यंत घरुन काम करण्यासंदर्भात सुचना दिल्याचे वृत्त आहे. ‘द इन्फॉर्मेशन’ने दिलेल्या वृत्तानुसार गुगल अल्फाबेटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ज्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करणं शक्य आहे त्यांनी २०२० संपेपर्यंत सध्या सुरु आहे त्याप्रमाणे घरुनच काम करावे असं सांगितलं आहे. आधी कंपनीने कर्मचारी १ जूनपर्यंत घरुन काम करतील असं म्हटलं होतं.

ऑनसाईट काम कऱणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनी जून किंवा जुलैमध्ये आपली कार्यालये सुरु करणार असल्याचेही पिच्चाई यांनी स्पष्ट केलं आहे. लोकांनी थेट एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून कार्यालयामधील व्यवस्थापनासंदर्भात कंपनी अतिरिक्त काळजी घेणार असल्याचेही स्पष्ट केलं आहे.