भारत आणि पाकिस्तानदरम्यान सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारतीय लष्कर आक्रमक पवित्रा घेत आहे. त्यामुळे भारताकडून संभाव्य हल्ला होण्याच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीरातील ४ दहशतवादी तळ बंद करण्यात आले आहेत.

गुप्तचर यंत्रणांनी सरकारी सुत्रांना याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, पीओकेतील निकिअल येथे १६ मार्च रोजी यासंदर्भात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अश्फाक बरवाल यांच्या बैठक झाली. या बैठकीत भारतीय लष्कराकडून पुन्हा हल्ला होण्याची भीती असल्याने पीओकेतील तळ बंद करण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतातील राजौरी आणि सुंदरबनीच्या विरुद्ध दिशेला पीओकेत असणाऱ्या कोटली आणि निकीअल भागातील दहशतवाद्यांचे तळ आणि कार्यालये लष्करचा दहशतवादी अशफाक बरलकडून नियंत्रित केले जातात. तसेच पीओकेतील पाला आणि बाघ भागात जैशचे दोन दहशतवादी तळ आहेत. तसेच कोटली येथे हिज्बुल मुजाहिद्दीनकडून एक तळ चालवला जात आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१९ मध्ये आजवर ६३४ वेळा पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर गेल्या वर्षी १६२९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.